कोरोनापासून बचाव करण्यासाठी असंख्य मंडळी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकाळ-संध्याकाळ काढा सेवन करताना दिसतात.
- काढे हे शरीरासाठी, शरीरातील इन्फेक्शन दूर करण्यासाठी हिताचे आहेत, याबाबत कोणाचेच दुमत नाही. परंतु त्याचे सेवन प्रमाणात न केल्याने दुष्परिणाम देखील तितकेच समोर येत आहेत.
- एका अहवालानुसार अधिक प्रमाणात काढा सेवन केल्यास पोटदुखीचा त्रास उदभवू शकतो. त्याचवेळी लिव्हरच्या समस्येने ग्रस्त असलेले रुग्ण देखील वाढत चालले आहेत. थोडक्यात, जादा प्रमाणात काढा सेवन केल्याने अनेक नवीन समस्या समोर उभ्या राहत आहेत.
- काढय़ात वापरण्यात येणारे मीरे, दालचिनी, लसूण, सुंठ, आले, कोरफड आदींचा वापर किती आणि कसा करावा याबाबत लोकांना ठोस माहिती नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या सोयीने त्याचा वापर करत आहेत. एका अर्थाने ते आपल्या प्रकृतीची हेळसांड करत आहेत. गॅस्ट्रोलॉजिस्टकडे जावून पोटदुखी, गॅस, ऍसिडीटी यासारख्या दुखण्यांवर उपचार करत आहेत.
- कोणतीही रोगप्रतिकारक शक्ती ही एका रात्रीत वाढत नाही. नियमित व्यायाम, सकस आणि पौष्टिक जेवण, योगासन याआधारे रोगप्रतिकारक शक्ती वाढत जाते.
- प्रत्येक व्यक्तीचे वजन आणि वय यानुसार त्याच्या आहाराचे प्रमाण बदलत असते. त्यामुळे तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधांचे सेवन करु नये.
- आहारतज्ञ आणि आयुर्वेदाच्या तज्ञांच्या मते, काढय़ामध्ये वापरण्यात येणार्या दालचिनीत हेपेटॉक्सिन नावाचे तत्त्व असते. त्याचे अधिक सेवन हे आरोग्यासाठी हानीकारक आहे. दालचिनी, सूंठ आणि लवंग याचे संतुलित प्रमाण हे संसर्गाला रोखण्यासाठी फायद्याचे आहे. परंतु अतिसेवनाने उष्णतेचे गंभीर त्रासही उद्भवू शकतात.
- काढय़ाचे प्रमाण महिला, पुरुष, मुलांसाठी वेगवेगळे असू शकते. त्यामुळे त्याची इंत्यभूत माहिती गोळा करताना किंवा करण्याऐवजी वैद्यांचा सल्ला घ्या किंवा किमान आपली प्रकृती कशी आहे याचा तरी अंदाज घ्या आणि मोजक्या प्रमाणातच त्यांचे सेवन करा.