टीएमसीचे संयुक्त संयोजक समिल वळवईकर यांचा आरोप
पणजी / प्रतिनिधी
नगर आणि शहर नियोजन (टीसीपी) खात्याच्या ’गोवा भूविकास आणि इमारत बांधकाम नियमावली’त केलेल्या दुरुस्त्या म्हणजे गोव्याला उद्ध्वस्त करण्याचा भाजप सरकारचा हेतु उघड झाला आहे, असा आरोप गोवा तृणमूल काँग्रेसचे संयुक्त संयोजक समिल वळवईकर यांनी केला आहे.
पणजीतील पक्ष कार्यालययात काल बुधवारी त्यांनी समन्वयक मारियानो रॉड्रिग्स तसेच गोवा टीएमसी ’आयटी’ समन्वयक तनोज अडवलपालकर यांच्यासमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील आरोप केला. गोव्यातील शेतकऱयांना उद्ध्वस्त करण्याची सरकारला घाई झाली आहे. ’रेल्वे रुळांचे दुहेरीकरण, राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण आणि तनमार वीज पारेषण प्रकल्पामुळे गोव्याच्या पर्यावरणाचा आधीच नाश झाला आहे.
भाजप सरकारकडून लोकांचे सर्वस्व उद्ध्वस्त
भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अंतस्थ हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वळवईकर यांनी जोर दिला, ’सरकारने बहुमजली इमारती, फिल्म सिटी, गोल्फ कोर्स, फार्महाऊस आणि योग केंदे बांधण्यासाठी ’फ्लोर एरिया रेशीओ ’ (एफएआर) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वेळी ,जेव्हा गोवा आधीच पायाभूत सुविधांच्या भरभराटीने त्रस्त झालेला आहे, तेव्हा सरकार गोव्यातील लोकांचे जिवन, पर्यावरण , निसर्ग, उपजीविका नष्ट करत आहे.’’
सर्व पंचायतींनी ठराव समंत करावे
आम्ही अशा सर्व गोमंतकीयांच्या पाठीशी उभे आहोत, ज्यांनी अशा घातक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांविरोधात आवाज उठवला आहे. राज्यातील सर्व पंचायतींनी घातक नवीन सुधारणांना विरोध करणारे ठराव संमत केले पाहिजेत.’ राजकीय विचारसरणीत फरक असू शकतो, परंतु वारसा आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे. गोवा टीएमसी गोवा जमीन विकास आणि इमारत बांधकाम नियमावलीतील सुधारणांना तीव्र विरोध करते आणि राज्यातील सर्व पंचायत सदस्यांना एकत्रितपणे त्याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन करत आहे.