वृत्तसंस्था/ मुंबई
2021 साली होणाऱया टोकियोतील पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या दुहेरी अंकात राहील, असा विश्वास भारताची महिला पॅरा ऍथलीट आलणि पदक विजेती दीपा मलिकने व्यक्त केला आहे.
गेल्या काही वर्षांच्या कालावधीत अपंगाच्या क्रीडास्पर्धामध्ये भारताची कामगिरी सातत्याने चांगली होत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे पुढीलवर्षी होणाऱया टोकियो पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या दुहेरी अंकात राहील, असे दीपा मलिकने म्हटले आहे. द स्पोर्ट्स लाईट या कार्यक्रमात ऑनलाईनद्वारे दीपा मलिक भारताचा पॅडलर मुदीत दाणीसमवेत चर्चा करताना तिने आपले वरील मत व्यक्त केले. अलिकडे भारतीय पॅरा ऑलिंपिक समितीच्या अध्यक्षपदी दीपा मलिकची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या रिओ पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत दीपा मलिकने रौप्यपदक मिळविली होती. पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळविणारी दीपा मलिक ही एकमेव भारतीय महिला स्पर्धक आहे. रिओ पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या 19 जणांच्या संघाने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कास्यपदक मिळविले होते. 2018 च्या आशियाई पॅरा स्पर्धेत भारताचा 194 जणांचा संघ सहभागी झाला होता आणि त्यांनी 72 पदकांची कमाई केली होती. 49 वर्षीय दीपा मलिकने आयपीसी विश्व स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले होते. रिओ पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत दीपा मलिकने महिलांच्या गोळाफेकमध्ये 4.61 मी.चे अंतर नोंदवित भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. टोकियो ऍरा ऑलिंपिक स्पर्धेत दीपा मलिक आता खेळाडूची भूमिका वठविणार नसून ती प्रशासकीय अधिकारी म्हणून कामगिरी करणार आहे.