जानवली येथे अपघात : धान्य वाहतूक करणाऱया ट्रकमधील सर्व कामगार कोल्हापूरचे
हायवेवरील डायव्हर्शनमुळे एकाच लेनवर आले ट्रक : केबिनमध्ये बसलेले कामगार आतच अडकून पडले
कणकवली:
राष्ट्रीय महामार्गावर जानवली येथे सोमवारी सकाळी दोन ट्रकांमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात धान्य वाहतूक करणाऱया ट्रकमधील 15 कामगार जखमी झाले. यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमी कोल्हापूर येथील असून त्यांना कणकवली उपजिल्हा व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महामार्ग चौपदरीकरणांतर्गत ‘डायव्हर्शन’मुळे ही दोन्ही वाहने एकाच ‘लेन’वर असताना हा अपघात घडला. शासकीय धान्य वाहतूक करणारा रिकामा ट्रक व पाणी बाटल्यांची वाहतूक करणारा ट्रक या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. महामार्गावरील जानवली येथील अशोक लेलँड शोरुमनजीक आज सकाळी 6.45 च्या सुमारास हा अपघात झाला.
अपघातात जयराम बंबाजी बांबुरे (33), सचिन संजय बारड (27), विनायक कृष्णात चौगुले (38), मिलिंद तानाजी पाटील (24), मंगेश राजेंद्र चव्हाण (27), सागर भीमराव बोडके (28), चिरंजीव उत्तम पाटील (26), दीपक शिवाजी पाटील (28), रंगराव विठोबा कस्तुरे (35), सुशांत संजय डांगळे (23), रणजीत प्रकाश पाटील (24), धीरज नाथा पाटील (20), अमोल हिंदराव चौगुले (30), संजय अळुबा कातरड (25), विवेकानंद रामचंद्र चौगुले (29) हे जखमी झाले.
ट्रकांची समोरासमोर धडक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील शासकीय धान्य गोदामचे हे जखमी कामगार आहेत. कोल्हापूर सहकारी मजूर व हमाल संस्थेचे ट्रक शासकीय धान्याची वाहतूक करतात. त्यासाठी 15 ट्रक रविवारी कोल्हापूर येथून झाराप येथे धान्य घेऊन गेले. तेथे धान्य उतरविल्यानंतर सर्व ट्रक सोमवारी सकाळी कोल्हापूरच्या दिशेने निघाले. प्रत्येक ट्रकमध्ये कामगार बसले होते. यातील एका ट्रकमध्ये (एमएच09 सीयू 6867) सुमारे 20 कामगार होते. त्यातील 5 कामगार केबिनमध्ये, तर उर्वरित कामगार हौद्यामध्ये बसले होते. ट्रक जानवली येथील सुदीप कांबळे यांच्या घरानजीक असणारे ‘डायव्हर्शन’ ओलांडून पुढे रतांबे ओहोळानजीक आला असता, पुण्याहून गोव्याला जात असलेल्या पाणी वाहतूक करणाऱया ट्रकची (एमएच12 एसएफ9842) धान्य वाहतूक करणाऱया ट्रकला धडक बसली. हा ट्रक चालक नवनाथ बळीराम पवार (32, रा. बीड) चालवित होता.
कामगार केबिनमध्ये अडकले
ही धडक एवढी तीव्र होती की, धान्य वाहतूक करणाऱया ट्रकचा दर्शनी भाग आत चेपला गेला. परिणामी केबिनमधील चालकासह सर्वजण आतच अडकून पडले. दोन्ही वाहनांनी करकचून ब्रेकही केल्याने हौद्यामध्ये बसलेले कामगारही आपटून जखमी झाले. अपघातात दोन्ही ट्रकच्या दर्शनी काचाही फुटल्या होत्या.
दुसऱया ट्रकमधून जखमी रुग्णालयात
अपघातप्रसंगी याच मार्गाने ‘मॉर्निंग वॉक’ करत असलेले सत्यशोधक संघटनेचे नेते तथा समतादूत ऍड. सुदीप कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रा.पं. सदस्य गजानन रेडकर, समीर नाईकही आले. तिघांनीही विव्हळत असलेल्या जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली. कांबळे यांनी 108 रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, पाऊण तास उलटूनही रुग्णवाहिका न आल्याने अखेर कांबळे यांनी धान्य वाहतूक करणाऱया दुसऱया ट्रकमधून सर्व कामगारांना कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टर, कर्मचाऱयांकडून तातडीने उपचार
रुग्णालयात डॉ. मनोहर सोनावणे, डॉ. सचिन उईके, डॉ. अनुप पळसंबकर, डॉ. चांद शिकलगार, डॉ. सतीश टाक, परिचारिका सुरेखा चव्हाण, मधुरा राणे, शुभदा परब, एस. एस. सावंत, एस. एस. मुसळे, करिष्मा चव्हाण, सुनील यादव, विजय चौरे आदींनी तातडीने उपचार केले. यातील गंभीर जखमींना अन्यत्र हलविण्यात आले.
नागरिक, पोलीस घटनास्थळी दाखल
अपघाताची माहिती समजताच महामार्ग विभागाचे उपनिरीक्षक अरुण जाधव, हवालदार सुनील वेंगुर्लेकर, संकेत चिंदरकर, कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे, हवालदार वंजारे, कॉन्स्टेबल रुपेश खाडये आदींसह नागरिकही घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्याने तेथे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. मात्र, सकाळी 11 च्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला करण्यात आली.
अपघाताची पोलिसांत नोंद
अपघाताची फिर्याद कामगार चिरंजीव उत्तम पाटील (26, रा. करवीर- कोल्हापूर) यांनी कणकवली पोलिसांत दिली. त्यानुसार पाणी वाहतूक करणाऱया ट्रकचा चालक नवनाथ पवार याच्याविरोधात हयगयीने, अविचाराने वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक उपनिरीक्षक व्ही. ए. चव्हाण करत आहेत.
108 रुग्णवाहिकेचा हलगर्जीपणा
दरम्यान, अपघातानंतर ऍड. सुदीप कांबळे यांनी 108 रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, रुग्णवाहिका पाऊण तास उलटूनही घटनास्थळी न आल्याने कांबळे यांनी धान्य वाहतूकीच्याच ट्रकने कामगारांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर एका गंभीर जखमीला तात्काळ खासगी रुग्णालयात हलविणे आवश्यक होते. त्यासाठी रुग्णालयाचे डॉ. चांद शिकलगार यांनी स्वत: 108 रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, 108 रुग्णवाहिकेतर्फे, खासगी रुग्णालयात नेणे आमच्या नियमात नसल्याचे सांगण्यात आले. यावर कांबळे यांनीही 108 च्या चालकास सुनावले. आधी रुग्णाचा जीव वाचविणे गरजेचे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
…म्हणूनच अपघातांना निमंत्रण
सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या कामादरम्यान ठिकठिकाणी रस्ते अपूर्णावस्थेत असल्याने ‘डायव्हर्शन’ ठेवण्यात आली आहेत. जानवली येथेही सुदीप कांबळे यांच्या घरासमोर ‘डायव्हर्शन’ आहे. मात्र, ‘डायव्हर्शन’ असल्याची गोव्याच्या दिशेने जात असलेल्या वाहनांना कल्पना येत नाही. परिणामी दोन्ही बाजूंची वाहने एकाच लेनवर अचानक समोर येत असल्याने यापूर्वीही अनेकदा अपघात घडले आहेत. हा अपघातही याच कारणांमुळे घडला आहे, असा आरोप ऍड. सुदीप कांबळे यांनी केला.