ऑनलाईन टीम / ठाणे :
मुंबईसह उपनगरात पावसाचे जोरदार धुमशान सुरू आहे. त्यातच ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व येथे डोंगर परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. तर आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ चार नागरिकांना बाहेर काढले, तर अद्यापही काही नागरिक अडकल्याची शक्यता असल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे.
दरम्यान, मागील तीन दिवसांपासून ठाण्यात पावसाने कहर केला आहे. ठाणे शहरासह जिल्ह्याला पावसाने चांगलचं झोडपून काढले आहे. यामुळे ठाण्यातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर ठाण्यानजीक असणारा मासूंदा तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे शहराला पुरजन्य परिस्थिती आली आहे. ठाणे महानगर पालिकेच्या मुख्यालयाबाहेरही गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहेत.