नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा मौलिक सल्ला
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी शहराच्या विकासासाठी भविष्यात लागेल तेवढा नगरविकास खात्याच्या माध्यमातून निधी दिला जाईल. आता नगर परिषदेच्या नूतन इमारतीसाठी साडेसोळा कोटी मंजूर करून तत्काळ 5 कोटी वर्गही करण्यात आलेत. शहरवासियांसाठी चांगले काम करा, कामांचा दर्जा चांगल्या प्रतीचा ठेवा. जेणेकरून कारवाईची वेळ येता कामा नये. लोकांचे पैसे आहेत, ठेकेदाराच्या भल्यासाठी नको तर लोकांसाठी कामे करा, असा मौलिक सल्ला राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
रत्नागिरी नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा वैशिष्यपूर्ण योजनेंतर्गंत केल्या जाणाऱया बांधकामाचा भूमिपूजन सोहळा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सोमवारी पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम, नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडय़ा साळ<वी, उपनगराध्यक्ष रोशन फाळके, मुख्याधिकारी सुशांत बाबर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटय़े, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख बिपीन बंदरकर आदींची उपस्थिती होती.
मंत्री उदय सामंत यांनी न.प.च्या नवीन प्रशासकीय इमारतीला निधीसाठी शब्द दिला होता. त्यानुसार शासनाकडून इमारतीसाठी साडेसोळा कोटींचा निधी मंजूर झाल्याचे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडय़ा साळवी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. आता शहरात अनेक विकासकामांना प्रारंभ झाला आहे. सर्व रस्ते नादुरूस्त झाले आहेत. अजूनही सुमारे 7-8 कोटींची कामे प्रलंबित असून त्यालाही निधी द्यावा, अशी मागणी साळवी यांनी यावेळी केली. आमदार राजन साळवी यांनीही राजापूर शहराला पाणीशुध्दीकरण प्रकल्प, तेथील रस्ते तसेच लांजा नगर पंचायतीसाठीही भरीव निधी द्यावा, अशी मागणी यावेळी केली.
नगर परिषद असो, नगर पंचायत, नगर पालिका, महानगर पालिका असो, तेथून प्रशासकीय कारभार सुरू असतो. विकासाचे केंद्र असल्याने त्या इमारतीच्या माध्यमातून लोक व प्रशासन काम करत असतात. लोकप्रतिनिधींनी मागणी केली व तात्काळ न.प. इमारतीसाठी साडेसोळा कोटी दिले. त्या निधीतून रत्नागिरी शहरवासियांसाठी चांगली इमारत व चांगले काम करा, असे प्रतिपादन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शहरातील रस्त्यांसाठी 6 कोटींची, सुशोभिकरणासाठी 2 कोटींची मागणी केली. त्याची तातडीने पूर्तता करणार. राजापूर, लांजासाठी केलेल्या निधीविषयी तत्काळ ऑर्डर काढणार असल्याचे सांगितले. सर्व नगर पंचायतींनाही तत्काळ निधी देणार आहे. कोकण नेहमीच सेनेच्या पाठीशी राहिले आहे. गोवा, केरळपेक्षाही सुंदर असलेले कोकण अधिक सुंदर करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखा. कोकणात पर्यटन विकासासाठी चांगले रस्ते होणे आवश्यक असल्याचे मंत्री शिंदे यांनी सांगितले.
मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरीसाठी निधीची मागणी
कोकणासाठी ज्या-ज्या विकासकामांसाठी निधीची मागणी केली. त्यापेक्षाही दामदुप्पट निधी देण्याचे काम राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. न.प.च्या नव्या इमारतीसाठी 16 कोटींची मागणी करताच 16 मिनिटांत विचार न करता तत्काळ निधी मंजूर केला. त्यातील 5 कोटी वर्गही केले. शहराला रस्त्यांसाठी 10 कोटी, डीपीडीसीमधून साडेआठ कोटी दिले. पण अपूर्ण असलेल्या कामांसाठी अजूनही साडेसहा कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी सामंत यांनी यावेळी केली. वैशिष्टय़पूर्णमधून सुशोभिकरणासाठी अजून 2 कोटींची गरज आहे. तसेच राजापूर, लांजासाठीही निधी द्यावा, अशी मागणीही नगरविकासमंत्री शिंदे यांच्याकडे कार्यक्रमात केली.