डायनासोर नावाचे प्राणी पृथ्वीवर होऊन गेले असे पूर्वी वाचले होते. काही वर्षांपूर्वी ‘जुरासिक पार्क’ नावाची कादंबरी बाजारात आली. नंतर तिच्यावर आधारित सिनेमा आला. तेव्हा हे प्रकरण नीट समजले. खरं सांगायचं तर टीव्हीवर सिनेमा बघताना ते डायनासोर लोक जेव्हा पडद्यावर एकटेच असतात तेव्हा त्यांची भीती वाटत नाही, तर किळस येते. कारण टीव्हीच्या छोटय़ा पडद्यावर ते पालीसारखे दिसतात. ते जाऊ देत. या मंडळींची आठवण येण्याचं कारण निराळं आहे.
डायनासोर लोकांच्या काळात मानवप्राणी होता की नाही, कोणास ठाऊक. असला तरी त्यांच्या पायांखाली आल्यावर चिरडला गेला असेल. किंवा मांसाहारी डायनासोरांनी त्याला खाल्लं असेल. आपण शेंगा न सोलता खाऊ शकत नाही. पण डायनासोर लोक माणसांना अंगावरच्या कपडय़ांसह खात असतील का अशी एक शंका मनात येते.
तूर्तास मानवजात कोरोनाला तोंड देते आहे तशी डायनासोर लोकांच्या काळात देखील तोंड देत असेल. म्हणजे काय, तर शास्त्रज्ञ लोक डायनासोरांचा पराभव करण्यासाठी औषध शोधत असतील, डॉक्टर लोक उपलब्ध औषधांनिशी जखमी रुग्णांना बरे करण्याचा प्रयत्न करीत असतील, काही लोक डायनासोरांपासून लपण्याची खबरदारी घेत असतील. काही लोक बेदरकारपणे सर्वत्र हिंडत असतील, सरकारे लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असतील, खाजगी रुग्णालयांची व्यवस्थापने हात धुवून घेत असतील, काही पुढारी सरकारला अडचणीत आणण्यासाठी लोकांना शाळेत, देवळात, मैदानात, बागांमध्ये, जिममध्ये घुसायला आणि गर्दी करायला फूस देत असतील, डायनासोरांनी लोकांना मारलं की हे पुढारी सरकारचा राजीनामा मागत असतील.
सरकार दरबारचे काही भामटे डायनासोरांपासून रक्षण करणारे चिलखत शोधल्याचा खोटा दावा करून लोकांना फसवत असतील. अमुक पोषाखामुळे डायनासोर तुमच्याकडे बघत नाही आणि तुमची इम्युनिटी वाढते अशी थाप पचून जात असेल. तेव्हादेखील डायनासोरांशी लढायला पौर्वात्य पारंपरिक शस्त्रे श्रे÷ की पाश्चिमात्य शस्त्रे श्रे÷ असे वाद होत असतील. डायनासोरांचा प्रादुर्भाव कोणामुळे झाला यावर तेव्हाच्या विविध धर्मगुरुंमध्ये लढे चालू असतील. आपलाच देव आपल्याला डायनासोरपासून वाचवील असे प्रत्येक धर्माच्या लोकांना वाटत असेल. धर्म श्रे÷ की विज्ञान यावर वाद होत असतील. आणि डायनासोर नष्ट झाल्यावर त्याचे श्रेय घेण्यासाठी सगळे आपापसात नक्की लढले असतील.