प्रतिनिधी /पणजी
जनसंघाचे – भाजपचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी बलिदान दिवस म्हणून साजरी करण्यात आली. त्यानिमित्त पणजीतील भाजप कार्यालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे व पण्जीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी डॉ. मुखर्जी यांना आदरांजली अर्पण केली.
गोवा राज्यातील सर्व 40 ही मतदारसंघांतून सुमारे 200 ठिकाणी डॉ. मुखर्जी यांना श्रद्धांजली देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती तानावडे यांनी दिली. ते म्हणाले की मुखर्जी हे खरे देशभक्त होते. वयाच्या 52 व्या वर्षी यांनी या देशाचा निरोप घेतला. पण त्यांनी देशासाठी जे काही केले ते इतिहासात कायमस्वरुपी राहणार आहे. पं. नेहरू मंत्रिमंडळात डॉ. मुखर्जी मंत्री होते. तथापि जम्मू-काश्मीरबाबतची नेहरुंची भूमिका त्यांना मान्य नव्हती. जम्मू-काश्मीर भारताचाच भाग आहे, असे ते म्हणायचे. पण तेथे जाण्यासाठी पासपोर्ट लागायचा व त्याला डॉ. मुखर्जींचा विरोध होता. त्यातून नेहरुंशी पटले नाही. म्हणून त्यांनी राजीनामा दिला व मंत्रिमंडळातून बाहेर पडले. व विरोधी पक्षनेते बनले. जम्मू-काश्मीरप्रकरणी त्यांनी आंदोलने सुरू केली व पासपोर्टशिवाय तेथे प्रवेश केला म्हणून त्यांना अटक करून कारागृहात डांबण्यात आले. परंतु त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली, असे तानावडे म्हणाले. डॉ. सावंत यांनी सांगितले की जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, हे त्यांचे स्वप्न होते. ते शेवटी पूर्ण झाले व तेथील 371 वे कलम हटवण्यात आल्याने त्यांना खऱया अर्थाने श्रद्धांजली मिळाली आहे. देशासाठी त्यांनी बलिदान दिले म्हणून हा दिवस बलिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली. भाजपच्या पणजी मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.