मंत्री मुरुगेश निराणी यांचा इशारा : स्फोटकांचा अवैध साठा परत करण्याची सूचना
प्रतिनिधी / बेंगळूर
चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ात जिलेटिनच्या कांडय़ांचा स्फोट झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला होता. अवैधपणे जिलेटिनचा केलेला साठाच या घटनेला कारणीभूत होता. या घटनेची राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेतली असून राज्यातील अनधिकृत क्वॉरी आणि खाणींच्या व्यवहारांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. दरम्यान, खाण आणि भू-विज्ञान खात्याचे मंत्री मुरुगेश निराणी यांनी कठोर सूचना केल्या असून क्वॉरी व खाणींच्या ठिकाणी बेकायदेशीरपणे स्फोटकांचा साठा केला असेल तर तो चार आठवडय़ांमध्ये सरकारकडे जमा करावा. अन्यथा संबंधितांच्या खाणींचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा दिला आहे.
रायचूर जिल्हय़ाच्या लिंगसगुरु तालुक्यातील हट्टी सोन्याच्या खाणींच्या प्रदेशाला भेट दिल्यानंतर त्यांनी अधिकाऱयांसमवेत प्रगती आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खाणी किंवा क्वॉरींच्या ठिकाणी बेकायदेशीरपणे स्फोटके जमा केलेली असतील तर ते खाण-भूविज्ञान खात्याकडे परत करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याकरिता चार आठवडय़ांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर तपासणीवेळी स्फोटकांचा अवैध साठा आढळून आल्यास परवाने रद्द करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.