राज्यात कडक कायदा लागू होणार : वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती.दहाव्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन
प्रतिनिधी /पणजी
संपूर्ण राज्यात जेव्हा बार आणि रेस्टॉरंटला परवाना देण्यात येतो तेव्हा काही बार आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण व मद्य चांगल्या प्रतीचे मिळत असल्याने भरपूर प्रमाणात लोक जातात. तेव्हा बार ऍण्ड रेस्टॉरंटने एक टॅक्सी आणि ड्रायव्हर ठेवण्याचा कायदा लवकरच करण्यात येणार आहे. मद्यपान करणाऱया ग्राहकाला हॉटेलवाल्यांनी रस्त्यावर एकटे सोडू नये. त्याला घरी पोहोचविण्याची जबाबदारी बार ऍन्ड रेस्टॉरन्टच्या मालकाची आहे. यासाठी लवकरच राज्यात कडक कायदे लागू करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
पणजीत आयोजित केलेल्या दहाव्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वाहतूक संचालक राजन सातार्डेकर, वाहतूक खात्याचे सचिव तारिक थॉमस, रोलंड मार्टीन्स उपस्थित होते. दरम्यान, यावेळी मंत्री गुदिन्हो यांच्याहस्ते रस्ता सुरक्षा वाहनाचे उद्घाटन करण्यात आले.
डिसेंबरपर्यंत बसस्थानकावरील शेडचे काम
मागील दहा वर्षे सरकार रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करत आहेत. रस्ता सुरक्षा कशी असावी याबाबत जनजागृती केली जात आहे. सरकारतर्फे नागरिकांसाठी खात्यात ऑनलाईन सेवा व इतर सेवा देण्यात आली आहे. तसेच डिसेंबरपर्यंत आणखी ऑनलाईन सेवा येणार आहेत. तसेच कदंबा बसस्थानकाची अवस्था बिकट झाली आहे. परंतु या बसस्थानकाच्या कामाची 1.76 कोटी रुपयांची निविदा जारी करण्यात आली असून डिसेंबरपर्यंत बसस्थानकावरील शेडचे काम होईल, असे आश्वासन वाहतूकमंत्री गुदिन्हो यांनी दिली.
रस्ता सुरक्षा वाहनाचे उद्घाटन
यंदापासून ग्रामीण भागात रस्ता सुरक्षेबाबत कळावे यासाठी वाहनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. राज्यात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. वाहतूक व्यवस्थापनाने नियम कडक करूनही नागरिक बेजबाबदारपणे वागताना दिसून येतात. वारंवार नियमांचे उल्लंघन होताना दिसून येते. नागरिकांना नियमांची माहिती मिळावी यासाठी वाहनाचे उद्घाटन करण्यात आले असून हे वाहन ग्रामीण भागात जाणार आहे. गोमंतकीय सुरक्षित हवे आहेत. स्वतःला सुरक्षित ठेवणे तुमच्या हातात आहे. वाहन चालविताना दुसऱयाचीही काळजी घेणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे अपघात कमी करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
वाहन चालविताना काळजी घ्या : सातार्डेकर
सगळय़ांनी वाहन चालविताना काळजी घेतली पाहिजे. जीवन हे अमूल्य आहे. विचार करून वाहन चालवा, असे आवाहन राजन सातार्डेकर यांनी यावेळी केले. गोव्यात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित केला जातो. यंत्रणा, साधनसुविधा, व्यवस्था रस्ता सुरक्षा सप्ताहात समाविष्ट होणे आवश्यक आहे. तसेच मागील दहा वर्षातील रस्ता सुरक्षाबाबतचा अहवाल केंद्र सरकारकडे पोहचणे आवश्यक आहे.
अपघात कमी करण्यासाठी मोहीम राबवा : रोलंड
यंदा विविध खाते या सप्ताहात समाविष्ट करण्यात आले आहे. अपघात कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबविणे आवश्यक आहे, असे मत रोलंड मार्टिन यांनी व्यक्त केले. वाहने लक्षपूर्वक चालवा, जीवन सुरक्षित जगा या संकल्पनेने पणजी कदंबा बसस्थानक येथून दहाव्या रस्ता सुरक्षा सप्ताहाला सुरुवात झाली. यावेळी रस्ता सुरक्षेबाबत डिचोली येथील शांताई संस्थेच्या युवा-युवतींनी पथनाटय़ सादर केले. तसेच अपघात कसे टाळावेत आणि अपघात होणारा कुटुंबावरील आघात याची माहिती देणारे लघुपटही दाखविण्यात आले.