प्रतिनिधी/ बेळगाव
यरमाळ रोड, बाळकृष्णनगर क्रॉस नं. 1 परिसरात मोठा तलाव असून पावसाचे पाणी भरून ओव्हरफ्लो होत असल्याने परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. तलावाची स्वच्छता करून देखभाल करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही समस्या उद्भवत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यरमाळ रोड वड्डर छावणी म्हणून ओळखल्या जाणाऱया परिसरातील समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. दरवषी पावसाळय़ात तलाव ओव्हरफ्लो होतो आणि परिसरातील रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी शिरते. या समस्येबाबत महापालिकेकडे अनेकवेळा तक्रारी करूनही याची दखल घेण्यात आली नाही. मागील वषी झालेल्या पावसामुळे परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तसेच सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे तलावाची स्वच्छता करून संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. पण याबाबत कोणतीच दखल घेण्यात आली नाही. या तलावात कचरा टाकला जातो. काही वेळा मृत जनावरेही टाकण्यात येत आहेत. त्यामुळे या तलावाला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हा तलाव पाण्याने भरून ओव्हरफ्लो होत आहे. परिणामी परिसरातील रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी साचले आहे. गुडघाभर पाण्यामध्ये कसे राहायचे असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. कोरोना विषाणूंच्या प्रसाराबरोबर डेंग्यू, मलेरिया, टायफॉईडसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. तरीदेखील येथील स्वच्छतेकडे आणि समस्येकडे महापालिका प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. पण ही समस्या अद्यापही जैसे थे आहे. त्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच येथील रहिवाशांना समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप समाजसेवक मनोहर शिरोडकर यांनी केला आहे. सदर समस्या निवारण्यासाठी तलावाची स्वच्छता करून संरक्षक कठडा बांधण्याची आवश्यकता आहे. किंवा हा तलाव पूर्णपणे बुजविण्याची गरज आहे. त्यामुळे आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.