दोन ट्रकमध्ये जोराची धडक : अन्य एक गंभीर
वार्ताहर/ तवंदी
तवंदी घाटात अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी सकाळी 7 वा. दोन ट्रकमध्ये झालेल्या अपघातामध्ये ट्रक चालक व क्लिनर दोघेही जागीच ठार झाले. चालक सागर तुकाराम जगताप (वय 35,) आणि क्लिनर नाना दत्तू पाटील वय (42) दोघेही पन्हाळा तालुक्यातील मिठारवाडी येथील रहिवासी आहेत. या अपघातात दोन्ही ट्रकचे सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, तवंदी घाट येथे ट्रक क्र. एम. एच. 09 सी. एन. 2809 हा कोल्हापूरहून बेंगळूरच्या दिशेने जात होता. बेंगळूरहून पुण्याकडे प्लायवूड भरुन ट्रक क्र. जी. आय. 25 व्ही. 4149 हा जात होता. घाटात या ट्रकचा चालक महंमद जलील (वय 35 रा. मोरवा आनंदपूर, उत्तर प्रदेश) याचा ताबा सुटल्याने ट्रकने दुभाजक सोडून समोरुन बेंगळूरच्या दिशेने जाणाऱया ट्रकला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, बेंगळूरकडे जाणाऱया ट्रकमधील चालक सागर जगताप आणि क्लिनर नाना पाटील या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर कोल्हापूरकडे जाणाऱया ट्रकमधील महंमद जलील हा गंभीर जखमी झाला. त्याला महामार्गावरील रुग्णवाहिकेतून उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठवून देण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर बनल्याने त्यास कोल्हापूरच्या सी.पी.आर.ला पाठवून देण्यात आले. या अपघातानंतर सुमारे 1 तास वाहतूक खोळांबली होती. सागर जगताप याच्या पश्चात आई, पत्नी व मुलगा तर नाना पाटील याच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
घटनास्थळी जयहिंद कंपनीचे कर्मचारी शरीफ करोली, निपाणी शहर फौजदार अनिलकुमार कुंभार, हवालदार बसवराज नावी, एस. एस. चिकोडे, के. बी. दड्डी यांनी भेट देऊन पाहणी केली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे.