ऍड. पुंडलिक रायकर यांचा दावा : ताळगांवात आतापर्यंत झालेल्या जमीन घोटाळ्यांची सीबीआय चौकशी व्हावी
प्रतिनिधी / पणजी
ताळगांव येथे सध्या सुरु असलेले ‘पंचायत घर’ प्रकल्पाचे काम पूर्णपणे बेकायदेशीर आहे. बळजबळीने शेतकऱयांची जमीन घेऊन तेथे बेकायदेशीररित्या बांधकाम पंचायतीतर्फे करण्यात येत आहे. यासंबंधी कागदपत्रे दाखविण्यास पंचायत टाळाटाळ करत आहे. सध्या सुरु असलेला हा प्रकल्प त्वरीत थांबवाव व लोकांना स्पष्टीकरण देऊनच या प्रकल्पाची सुरुवात करावी अशी मागणी ताळगांवचे समाजसेवक ऍड. पुंडलिक रायकर यांनी केला.
पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत सिसील रॉड्रीगीस, झेवियर आल्मेदा, कोंदीदो डायस, शेतकरी कामिलो फर्नांडिस व रोबर्ट फाल्कांव उपस्थित होते.
ताळगांव येथे हल्लीच पंचायत घर उभारण्यावरुन झालेल्या वादानंतर पंचायतीतर्फे पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टींचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यात काहीही तथ्य नाही. या विषयात आम्ही राजकारण करत नाही. राजकारण पंचायतीतर्फे करण्यात येत आहे. पंचायतीने 2006 मध्ये या प्रकल्पाला मान्यता दिली तेव्हा देखील हा प्रकल्प बेकायदेशीर होता व आजही बेकायदेशीरच आहे. त्यासंबंधीची कागदपत्रे आम्ही दाखवू शकतो, असा दावा त्यांनी केला.
अशावेळी विद्यमान सरपंच व माजी सरपंच किंवा अन्य पंचसदस्य यांपैकी कुणीही आमच्यासमोर येऊन आपली बाजू मांडावी, असे आव्हान ऍड. रायकर यांनी दिले. ताळगांवात याआधी देखील मोठे जमीन घोटाळे झाले आहेत. सरकारने त्यांची सखोल चौकशी करावी तसेच सीबीआयमार्फतही चौकशी व्हावी, अशी मागणीही रायकर यांनी केली.
या प्रकल्पाला आम्ही विरोध केला त्या दिवशी आम्हाला बळजबळीने व पोलिसांच्या आधारे बाजूला केले. सरपंचांनी आम्हाला बाहेरील गावातील म्हटले आहे. परंतु आम्ही गेल्या 10 वर्षापेक्षा अधिक काळ ताळगांवात राहत आहोत. आम्ही पंचायतीचे सर्व कर भरतो. त्यामुळे आम्हाला बोलण्याचा, वाईट गोष्टींना विरोध करण्याचा अधिकार आहे. ज्या लोकांनी पंचसदस्यांना निवडून दिले आहे त्यांच्याच पोटावर पाय ठेवण्याचा प्रकार सध्या पंचायत करत आहे. पंचायतीच्या या कृत्याबद्दल लोकांनी एकत्रित येऊन विरोध करण्याची गरज आहे, असे सिसील रॉड्रिगीस यांनी सांगितले.