प्रतिनिधी / कणकवली:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागामार्फत कर्मचारी संपात उतरले असून बुधवारी तिसऱया दिवशीही सिंधुदुर्गमधील एसटी वाहतूक 100 टक्के बंद होती. बसस्थानकांवर शुकशुकाट होता. शासनाने कितीही कारवाईचा बडगा उगारला, तरी आता माघार घेणार नाही. जे काही कर्मचारी संपात सहभागी झालेले नाहीत, त्यांनीही संपात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी कर्मचाऱयांकडून करण्यात आले.
रा. प. महामंडळाच्या कर्मचाऱयांनी संपात सहभागी होत डेपो, विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी केली. यावेळी डपो व्यतिरिक्त विभागीय कार्यशाळा व कार्यालयातील मिळून सुमारे 300 च्या जवळपास कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. 15 ते 20 कर्मचारी संपात सहभागी नसून त्यांनीही संपात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी कर्मचाऱयांनी केले.
रा. प. महामंडळाच्या कर्मचाऱयांचे शासनात विलिनीकरण व्हावे, हीच आमची प्रमुख मागणी आहे. सर्व कर्मचाऱयांनी एकत्रित येत सुरू केलेल्या संपाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. शासनाने कर्मचाऱयांवर कारवाई सुरू केली आहे. मात्र, काही झाले, तरीही आता कर्मचारी खंबीर राहणार असून जोपर्यंत शासनात विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असे कर्मचाऱयांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, कर्मचाऱयांच्या या संपामुळे सलग तिसऱया दिवशी सिंधुदुर्गमधील एसटी वाहतूक 100 टक्के बंद राहिली होती. दिवसभरात सुमारे 1500 च्या जवळपास फेऱया रद्द कराव्या लागल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, कणकवली तालुका प्रवासी संघाने एसटी कर्मचाऱयांच्या संपाला पाठिंबा दिला असल्याचे संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर व उपाध्यक्ष रमेश जोगळे यांनी सांगितले.
कामावर असलेल्या कर्मचाऱयांवर घोषणाबाजी
दरम्यान काही कर्मचारी कामावर हजर होते. ते कर्मचारी कार्यालय सुटल्यावर सायंकाळी घरी जात असताना गेटच्या बाहेर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱयांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. दुसरीकडे लांब पल्ल्याच्या खासगी बसेस तेजीत आल्या असून त्यांच्या दरातही वाढ झाली असल्याचे दिसत आहे. याचा फटका अप्रत्यक्षरित्या प्रवाशांना बसताना दिसत होता.