ता. पं. कार्यकारी अधिकाऱयांनी संबंधित पीडीओला दिली ताकीद : 130 पैकी केवळ 7 दिवस काम
प्रतिनिधी / बेळगाव
रोजगार हमी योजनेंतर्गत महिला कामगारांना वर्षातून किमान 130 दिवस काम देणे बंधनकारक आहे. असे असताना तुरमुरी, जनता कॉलनी आणि बाची येथील महिला कामगारांना वर्षभरात केवळ 7 दिवस काम देण्यात आले आहे. त्यामुळे या महिला कर्मचाऱयांनी तालुका पंचायत कार्यालयावर मोर्चा काढुन निदर्शने केली. आम्हाला काम द्या, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
रोजगार हमी योजनेंतर्गत तुरमुरी ग्राम पंचायतमध्ये काम द्या म्हणून या महिला कर्मचारी गेल्या बऱयाच दिवसांपासून हेलपाटे खात आहेत. यापूर्वीही त्यांनी याबाबत तालुका पंचायत अधिकाऱयांना माहिती दिली होती. त्यानंतर केवळ सात दिवसच काम देण्यात आले. या प्रकारामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ग्राम पंचायत अधिकाऱयांकडे गेले असता थातूरमातूर उत्तरे देण्यात येत आहेत. त्यामुळे आम्ही कोणाकडे ही कैफीयत मांडू, असेही यावेळी महिलांनी सांगितले.
काम उपलब्ध करण्याची सक्त ताकीद
महिलांनी तालुका पंचायतच्या व्हरांडय़ामध्येच ठाण मांडले. त्यामुळे तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी तातडीने त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी ग्राम पंचायत पीडीओंनाही बोलावून घेण्यात आले. यावेळी कलादगी यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेऊन पीडीओंना तातडीने काम उपलब्ध करण्याची सक्त ताकीद त्यांनी दिली.
यावेळी शिवाजी कागणीकर यांनी अधिकाऱयांना चांगलेच खडसावले. 130 दिवस काम देणे बंधनकारक आहे. किमान 100 दिवस तरी काम द्या, असे त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी राहुल पाटील यांच्यासह महिलावर्ग उपस्थित होता.