प्रतिनिधी / कुरुंदवाड
तेरवाड ता. शिरोळ येथील पंचगंगा नदीत रसायनयुक्त पाणी आल्याने नदी प्रदूषणामुळे मृत माशांचा खच पडला आहे. पाणी काळपट व दुर्गंधीयुक्त झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याचे नमुने घेण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सचिन हरबड यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंधाऱ्यावर कठड्याला दोरीने बांधून शासनाचा निषेध व्यक्त केला.
कोल्हापूर, इचलकरंजी व परिसरातील मैला व रसायन युक्त पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नदीतील जलचर मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडल्यामूळे ते पाण्यात कुजत असून पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. हे पाणी नदी काठावरील गावांना थेट पुरवठा होत असल्यामुळे नागरिक व जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.ऑ
पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित पडला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी शासन दरबारी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विश्वास बालीघाटे व बंडू पाटील यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केल्याने आज दुपारी तीन वाजता मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड बंधाऱ्यावर होते. त्यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन अहवाल तयार केला मात्र त्यांना तो अहवाल समाधानकारक नसल्याने त्यांनी हरबड यांना बंधाऱ्यावरील कठड्याला दोरीने बांधून शासनाचा निषेध केला. यावेळी बाबासाहेब भूजुगडे, रघु नाईक व संघटनेचे कार्यकर्ते हजर होते.