पीयुसीची लेखी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती
प्रतिनिधी /बेळगाव
मराठीत एक म्हण आहे, ‘तेलही गेले, तूपही गेले अन् हाती आले धुपाटणे’ अशीच काहीशी परिस्थिती पीयुसीची लेखी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची झाली आहे. परीक्षा विभागाने दिलेले गुण मान्य नसल्याने हे विद्यार्थी परीक्षेला बसले. परंतु परीक्षेत काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने त्यांच्यासमोर अग्निदिव्य निर्माण झाले आहे. त्यामुळे आम्हाला पूर्वीचेच गुण देऊन पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याची मागणी परीक्षा मंडळाकडे ते करीत आहेत.
कोरोनामुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षाची पीयूसी द्वितीय वर्षाची परीक्षा होवू शकली नाही. त्यामुळे दहावी व अकरावी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे पीयूसी द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये सरासरी विद्यार्थ्यांना 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. परंतु यामध्ये काहीजण समाधानी नसल्याने त्यांच्यासाठी पुन्हा लेखी परीक्षा घेण्याचा पर्याय शिक्षण विभागाने खुला केला. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील 531 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी केवळ 127 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. केवळ 23.92 टक्के इतका निकाल लागल्याची माहिती पीयूसी विभागाने दिली आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वीच्या मूल्यमापनात 550 हून अधिक गुण घेतले होते. ते विद्यार्थी लेखी परीक्षेत मात्र अनुत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांकडून मागील मूल्यमापनाचे गुण देण्याची मागणी होत आहे. पदवीपूर्व विभागाचे अधिकारी व शिक्षकांकडे विद्यार्थी व त्यांचे पालक येऊन भेटीगाठी घेत आहेत. परंतु अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तशी तरतूद नसल्याने परीक्षा मंडळाकडे तक्रार करावी, असे उत्तर विद्यार्थ्यांना मिळत आहे.
पुढील प्रवेशाचे घोडे अडले
दहावी व अकरावीच्या गुणांवर आधारित मूल्यमापनाने पीयूसी द्वितीय वर्षाचा निकाल देण्यात आला. या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. तसेच अधिक गुण मिळतील या आशेने पुन्हा लेखी परीक्षेचा पर्याय या विद्यार्थ्यांनी निवडला. परंतु अनुत्तीर्ण झाल्याने ऍडमिशनसाठी घातलेले लाखो रुपये अडकले आहेत. त्यामुळे यातून कोणता पर्याय काढावा, असा प्रश्न विद्यार्थी व त्यांच्या पालकांना पडला आहे.