रूपाणींच्या राजीनाम्यावर मुलीने व्यक्त केल्या भावना
गांधीनगर/प्रतिनिधी
गुजरातमध्ये भाजपाने मोठे फेरबदल केले आहेत. विजय रूपणींचा राजीनामा घेत त्यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांची वर्णी लावली आहे. रूपणींच्या राजीनाम्यानंतर अनेकांनी रुपाणी यांच्या राजीनाम्यामागील कारण सांगितली आहेत. काहींनी रूपणींची कमी होत असलेली लोकप्रियता राजीनाम्याचे कारण असल्याचे म्हंटले आहे. तर काहींनी पक्षांतर्गत विरोधामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागल्याचे म्हटले आहे. मात्र, विजय रूपाणी यांची मुलीने यासर्वांना सडेतोड शब्दात उत्तर दिले आहे. राधिका रुपाणी यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे टीकाकारांना उत्तर दिले आहे.
रुपाणी यांच्या मुलीने म्हटले आहे की, जेव्हा २००२ मध्ये अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाला होता, त्यावेळी माझे वडील मोदीजींच्या आधी तिथे पोहोचले होते. विजय रूपाणीच्या मुलीने ‘मुलीच्या दृष्टीकोनातून विजय रूपाणी’ असे लिहित ही फेसबुक पोस्ट केली आहे. तौक्ते चक्रीवादळासारख्या मोठ्या समस्यांमध्ये माझे वडील सकाळी २.३० पर्यंत उठायचे आणि लोकांसाठी व्यवस्था करण्यासाठी फोनवर गुंतलेले असायचे असे राधिकाने रुपाणी यांनी लिहिले आहे.
“बऱ्याच लोकांसाठी माझ्या वडिलांचा कार्यकाळ एक कार्यकर्ता म्हणून सुरू झाला आणि अनेक राजकीय पदांद्वारे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला, पण माझ्या मते, माझ्या वडिलांचा कार्यकाळ १९७९ मध्ये आलेला मोरबी पूर, अमरेलीतील ढगफुटी, कच्छ भूकंप, स्वामीनारायण मंदिर दहशतवादी हल्ला, गोध्रा घटना, बनासकांठा पूर या घटनांपासून सुरु झाला आहे. माझे वडील तौक्ते वादळात आणि कोविडच्या काळातही मोठ्या प्रमाणात काम करत होते,” असे राधिका यांनी म्हटले आहे.