v
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत माजी सहकारमंत्री स्व. विलासकाका आणि सदाशिवतात्या पोळ यांच्या तैलचित्रावरुन चांगलाच गोंधळ झाला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले आणि उपाध्यक्ष प्रदीप विधाते हे दोघे आक्रमक झाले होते. दोघांनीही प्रश्न विचारणाऱया सदस्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. दरम्यान, उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी तर राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनाच खडेबेल सुनावले.
सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी विनय गौडा, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली पोळ, कृषी सभापती मंगेश धुमाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन मनोज जाधव त्याच बरोबर सर्व विभागप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला श्रद्धांजलीपर आणि अभिनंदनपर ठराव मांडल्यानंतर जिल्हा परिषदेत नव्याने रूजू झालेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अरुण दिलपाक यांचा सत्कार करण्यात आला.
सभेच्या सुरुवातीपासूनच अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी रुद्रावतार घेतला होता. माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर आणि माजी आमदार सदाशिवरावतात्या पोळ यांचे तैलचित्र सातारा जिल्हा परिषदेत लावण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्याबाबत आपण एक समिती नेमली होती. त्या समितीचे पुढे काय झाले..?, असा विषय उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष उदय कबुले आणि उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी समितीची बैठक झाली असून आपण याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे, असे सांगितले. यावर मात्र, काही सदस्य आक्रमक झाले आणि त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. अरुण गोरे, प्रदीप पाटील, सागर शिवदास, भीमराव पाटील आक्रमक झाले होते. तैलचित्र अनावरणाचा अध्यादेश कधीचा आहे अशी विचारणा केली. त्यावर तो 2002 चा असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी दिली. ही माहिती मिळताच काही सदस्य आणखी आक्रमक झाले आणि त्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तैलचित्र लावण्याबाबत यापूर्वी असे प्रस्ताव पाठवले होते का..? आणि यानंतर जे लावले त्याला कोणते निकष लावले, अशी विचारणा अरुण गोरे, सागर शिवदास यांनी केली.
दीपक पवार यांनी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यावर करताच अध्यक्ष कबुले संतापले आणि त्यांनी पवारांना चांगलेच सुनावले. आम्ही दबावाखाली काम करत नाही. तुम्ही असे काहीतरी बोलू नका. हे सभागृह आहे. नियम पाळत चला. माझ्या परवानगीशिवाय कोणताही प्रश्न विचारायचा नाही, असे सांगितले. यानंतर पवार शांत बसले.
याचवेळी भारती पोळ म्हणाल्या, लक्ष्मणतात्यांसाठी कोणता निकष लावला, असा सवाल उपस्थित केला. संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या विषयावर आपले मत मांडले. विलासकाका आणि सदाशिवतात्या या दोघांचेच तैलचित्र लावून चालणार नाही तर भाऊसाहेब गुदगे यांचेही लावावे लागणार आहे. आता फक्त आपण हा निर्णय घेऊ आणि हा विषय थांबवू, असे संजीवराजे यांनी सांगितले. दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेत कोणाचे तैलचित्र लावायचे आणि त्याचे काय निकष असावेत यासाठी जिल्हा परिषदेत सोमवारी बैठक होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.