देशमुखनगर / वार्ताहर :
ऊस दराचे तुकडे करणारा कायदा शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा आहे. एफआरपीचे तुकडे न करता ती एकरकमी मिळावी. त्यामुळे यंदाचा स्वाभिमानीचा ऊस दराचा निर्णय लागत नाही, तोपर्यंत उसाचे एक कांडेही तोडू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला.
जावळवाडी ता. सातारा येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शेळके म्हणाले, कारखानदारांनी ऊस दराचे तुकडे केले तर शेतकऱ्यांना सोसायटी पिक कर्ज वेळेत भरता येणार नाही. कोणताही एक रकमी व्यवहार पूर्ण करता येणार नाही. शेतकरी पुरता अडचणीत सापडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच जागे झाले पाहिजे आणि सरकारला वठणीवर आणले पाहिजे. नाहीतर येणारी पिढी आपणास माफ करणार नाही. तसेच महावितरण कंपनीने शेतीपंपाची खोटी बिल तयार करून ते भरण्यासाठी तगादा लावला आहे. यासाठी वारंवार लाईट डीपी बंद ठेवून शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येत आहे. त्यासाठी कायदेशीर मार्गाने जाऊन त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे.