आपल्या प्राचीन भारतीय हिंदू धर्मात भगवान महाविष्णूंचे दशावतार सर्वांनाच माहीत आहेत. भगवंताने घेतलेले दहा अवतार हे लोकांच्या कल्याणाकरिता, भक्तांच्या उद्धाराकरिता घेतलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण हे पूर्णावतार होते. द्वापारयुगात भगवंताने अवतार घेऊन मनुष्याने प्रपंचात आणि परमार्थात कसे वागावे ह्याचे मार्गदर्शन केलेले आहे.
राम आणि कृष्ण हे दोनही अवतार आणि त्यांचे कार्य जरी वेगवेगळे असले तरीही कार्यशैलीत मात्र साम्यता आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी वालीचा वध करत असताना जे चातुर्य दर्शवले तेच भगवान श्रीकृष्णांनी महाभारत युद्धात दर्शवले आहे. नरसिंह, वामन अवतारातसुद्धा अशाचप्रकारचे चातुर्य भगवंताने दर्शवले आहे. ईश्वर हा निरंकुश सत्ता गाजवणारा जसा आहे तसाच तो सर्व प्राणीमात्रांसाठी माता-पित्याची भूमिका बजावणारासुद्धा आहे.
व्यवस्थापनशास्त्रात ज्यांना उत्तम व्यवस्थापक व्हायचे असेल त्यांनी ईश्वराकडून हे दोन गुण शिकावेत. कुठलीही औद्योगिक संस्था किंवा उद्योग समूह असेल तेथील प्रत्येक व्यवस्थापकाचा एक विशिष्ट स्वभाव असतो. प्रत्येक व्यवस्थापकाची एक कार्यपद्धती ठरलेली असते ज्यानुसार तो/ती स्वतःच्या अधिकाराचा कसा उपयोग करायचा आणि आपल्या सहाय्यकांशी कसे आणि किती संबंध ठेवायचे ह्याबाबत तो/ती स्वतंत्र असतात. व्यवस्थापक ज्यावेळी सर्व अधिकार स्वतःजवळ ठेवतात आणि अधिकारांचा हवा तसा उपयोग करतात किंवा सहाय्यकांच्या मतांचा जास्त विचार करत नाहीत अथवा संपूर्ण संस्थेत कडक नियंत्रण ठेवतात तेव्हा त्यांच्या ह्या कार्यशैलीला निरंकुश कार्यशैली असे म्हणतात. ह्या निरंकुश कार्यशैलीत सहाय्यकांच्या, कर्मचाऱयांच्या किंवा कामगारांच्या अपेक्षा, गरजा किंवा प्रतिक्रियांचा फारसा विचार केला जात नाही. काही प्रमाणात असे व्यवस्थापक आपल्याला मिळालेले अधिकार हे जन्मसिद्ध आहेत म्हणून स्वतःचे निर्णय इतरांवर लादतात. अनेक उद्योग समूहात किंवा औद्योगिक संस्थांमध्ये अशाप्रकारची निरंकुश कार्यपद्धती अवलंबिली जाते. आजकालच्या काळात मात्र सतत निरंकुश कार्यपद्धतीचा वापर म्हणावा तेवढा करता येत नाही.
पण ज्या औद्योगिक संस्थांमध्ये निरंकुश आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती नसेल तेथे मात्र उद्योग समूहाची भरभराट अतिशय मंदगतीने होत असते. निरंकुश कार्यपद्धती जरी हुकूमशाही व्यवस्थेसारखी वाटत असली तरीही जी हुकूमशाही लोकांच्या, जनसामान्यांच्या कल्याणासाठी केली जाते तिलाच लोकशाही व्यवस्था म्हणता येते. निरंकुश कार्यपद्धतीचा वापर करणारा व्यवस्थापक कसा असतो त्याविषयी श्रीसमर्थ दासबोधात असे म्हणतात की,
मुळापासून सैरावैरा ।अवघा पंचीकर्ण पसारा ।
त्यांत साक्षत्वाचा दोरा ।तोहि तत्वरूप ।।
दुरस्ता दाटल्या फौजा ।उंच सिंहासनी राजा ।
याचा विचार समजा ।अंतर्यामी ।।देहमात्र अस्तिमांशाचें ।तैसेंचि जाणावें नृपतीचें ।मुळापासून सृष्टीचें । तत्वरूप ।।01-02-03/03/15
ह्याचा अर्थ असा आहे की, जसा राजा उंच सिंहासनावर बसतो आणि त्याच्या दोन्ही बाजूला सैन्य असते. तसेच असणारी तत्वे ही सैन्यासारखी आहेत. त्यांच्यातील अंतरात्मा हा राजासमान आहे हे समजून घ्यावे. सैनिकांचा देह जसा हाडामासाचा असतो तसाच राजादेखील हाडामासाचा असतो. तसेच पंचभूतात्मक विश्व आणि त्याचा अंतरात्मा दोन्ही एकरूपच आहेत.
व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीने या ओव्यांचा विचार असा केला जाऊ शकतो की, निरंकुश कार्यपद्धतीत व्यवस्थापक आणि सहाय्यक, कर्मचारी, कामगार हे त्यांच्या हुद्यानुसार जरी वेगवेगळे असले तरीही त्यांच्यातील सर्वसमावेशक असलेले व्यवस्थापनशास्त्र मात्र एकरूपच आहे.
व्यवस्थापनशास्त्रात जशी निरंकुश कार्यपद्धती आचरणात आणली जाते अगदी तशीच पैतृक कार्यपद्धती आचरणात आणली जाते. या कार्यपद्धतीमध्ये एखाद्या कुटुंबात जशी पित्याची किंवा वडिलधाऱयांची एक भूमिका ठरलेली असते तशीच भूमिका अवलंबिली जाते. कुटुंबातील वडीलधारे जसे कुटुंबातील सदस्यांना योग्य मार्गदर्शन करतात, वेळोवेळी त्यांना मदत करतात, योग्य सल्ला देऊन त्यांच्या हिताचे रक्षण करतात. त्याचप्रमाणे, व्यवस्थापनक्षेत्रात जर पित्याने वडीलधाऱयांची भूमिका स्वीकारली तर त्यास पैतृक कार्यपद्धतीचा अवलंब केला असे म्हणतात. ह्या कार्यपद्धतीचा विशेष लाभ म्हणजे कर्मचाऱयांच्या आणि कामगारांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते.
जो/जी व्यवस्थापक पैतृक कार्यपद्धतीचा स्वीकार करतात त्यांच्याकडे सहाय्यक, कामगार आणि कर्मचारी आदराने पाहू लागतात आणि मान ठेवतात. ह्या पद्धतीचा अवलंब केल्यास औद्योगिक संस्थेत आणि उद्योग समूहात व्यवस्थापकांच्या नैतिक प्रभावात वाढ होऊन त्यांचा एकप्रकारचा दबदबा निर्माण होतो. ह्या कार्यपद्धतीच्या काही नकारात्मक बाजूसुद्धा आहेत. त्यात प्रामुख्याने ही कार्यपद्धत जर अवलंबिली गेली तर व्यवस्थापकांचे जे सहाय्यक असतात त्यांची पुढाकार घेऊन काम करण्याची वृत्ती कमी होते. कर्मचारी, कामगार आणि सहाय्यक हे व्यवस्थापकांवरच अवलंबून असल्याने त्यांचे मानसिक गुलाम बनतात. ज्या औद्योगिक संस्थांमध्ये पैतृक कार्यपद्धती अवलंबिली जाते तेथे पैतृक व्यवस्थापक दूर झाल्यास व्यवस्थापनात अनेक अडथळे निर्माण होतात. उद्योग समूहाचा व्याप जर लहान असेल तर पैतृक कार्यपद्धती आचरणात आणली जात नाही. उत्तम पैतृक कार्यपद्धतीचा ज्यांना अवलंब करायचा आहे अशा व्यवस्थापकांसाठी श्रीसमर्थांनी दासबोधात असे म्हटले आहे की,
नम्रपणें पुसो जाणें ।नेमस्त अर्थ सांगों जाणें ।बोलाऐसें वर्तो जाणे ।उत्तम क्रीया ।।जो मानला बहुतांसी ।कोणी बोलो न शके त्यासी ।धगधगीत पुण्यरासी ।माहांपुरुष ।।तो परोपकार करितांची गेला ।पाहिजे तो ज्याला त्याला ।मग काय उणें तयाला ।भूमंडळी ।। 08-09-10/04/19
ह्याचा अर्थ असा आहे की, ज्याचे प्रत्येकाशी बोलणे नीटपणाचे असते. कुठल्याही गोष्टीचा नेमका अर्थ तो नीटपणे सांगतो. जसे बोलतो तसे चालतो आणि त्याच्या हातून उत्तम क्रियाच घडतात. त्याला अनेक लोक मानतात त्यामुळे कोणीही काहीही बोलू शकत नाही. तो तेजस्वी आणि पुण्यवान महापुरुष असतो. तो सतत परोपकार करीत जातो त्यामुळे तो सगळय़ांना हवाहवासा वाटतो. अशा परोपकारी पुरुषाला जगात काहीच कमी पडत नाही.भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रात निरंकुश आणि पैतृक कार्यपद्धतींचा संगम पहावयास मिळतो. ज्यांना स्वतःची औद्योगिक संस्था किंवा उद्योग समूह वाढवायचा असेल त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचा अभ्यास करावा.
– माधव किल्लेदार