सातारा / प्रतिनिधी :
कोरोना महामारीच्या काळात आरोग्य यंत्रणेकडून अनेकदा चुकीची आकडेवारी दाखवली गेल्याने जिल्ह्यात नाहक पॅनिक वातावरण तयार होत आहे. चुकीचे आकडे जाहीर होत असल्याचे ‘तरुण भारत’ने अनेक प्रकार उघडकीस आणले आहेत. असाच प्रकार दि. 27, 28 या तारखांमध्ये झालेल्या मृत्यूच्या नोंदी मागच्या तारखेने भरल्या गेल्याची बाब ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध करताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सोमवारी संबंधित रुग्णालयांना नोटीसा बाजवल्या. त्या नोटीसा पोहचताच संबंधित रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले असून, जिल्हा रुग्णालयाच्या कोविड विभागालाही नोटीस काढण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची वस्तुस्थिती ‘तरुण भारत’ने अचूक बातमीच्या माध्यमातून गेली पंधरा महिने वाचकांसमोर मांडली. जिल्हावासियांना कोरोनाची दाहकता कशी आहे, या पासून कोरोनाच्या विळख्यातून जिल्हा कसा बाहेर पडत चालला आहे, हे परखडपणे मांडले आहे. काम करताना प्रशासनाकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत, त्याही तरुण भारतच्यावतीने मांडण्यात आल्या. मग बाधितांचा आकडा अपलोड करणे असेल वा आता मृत्यूच्या नोंदी करण्याचे काम असेल याबाबी प्रकर्षाने तरुण भारतने उजेडात आणल्या. जिल्ह्यावर लादलेला लॉकडाऊन कमी करण्यासाठी तरुण भारतकडून वास्तव मांडले गेले. गेल्या चार दिवसांपूर्वी जिल्ह्याचा मृत्यूदर वाढला होता. अचानक वाढलेल्या मृत्यू दरामुळे सर्वच जिल्हावासिय चिंतेत होते. परंतु तरुण भारतने खरे कारण शोधून काढले. ज्या दिवशी रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्याच दिवशी त्या रुग्णालयाने नोंदणी करणे आवश्यक असते. पंरतु तसे न झाल्याने आकडा वाढला असल्याचे निदर्शनास येताच सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी संबंधित रुग्णालयांना नोटीस काढली.
ज्या दिवशी रुग्णांचे मृत्यू होतात त्याच दिवशी कोरोनाच्या साईटवर माहिती अपलोड करा. अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येवू नये, असे त्या नोटीसमध्ये म्हटले आहे. सोमवारी ही नोटिस रुग्णालयांना पोहचली आहे.
कोणाची हयगय करणार नाही
मी अनेकदा यासंदर्भात रुग्णालयांना सुचना दिलेल्या आहेत. त्यांनी वेळेत माहिती अपलोड करणे महत्वाचे आहे. ज्या रुग्णालयांकडून वेळेत माहिती भरण्याचे काम होणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई जाईल.