केवळ 2,992 जण गैरहजर : 58 कोरोनाबाधित विद्यार्थ्यांनीही दिली परीक्षा : शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांची माहिती
प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोना परिस्थितीतही मागील वर्षाप्रमाणे यंदा देखील अत्यंत सुरक्षा व्यवस्थेत दहावी परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. प्रथमच परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला आहे. सोमवारी गणित, विज्ञान आणि समाज विषयांचा एकत्रित पेपर झाला. परीक्षेच्या पहिल्या दिवशी राज्यभरात 99.64 टक्के विद्यार्थी हजर झाले होते. यंदा परीक्षेसाठी 8,75,508 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,992 विद्यार्थी गैरहजर राहिले.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे एकूण 58 कोरोनाबाधित विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिली आहे. त्यामध्ये बेंगळूर उत्तर, शिमोगा, गुलबर्गा, कोप्पळ, गदग आणि म्हैसूर जिल्हय़ात प्रत्येकी एक, बेळगाव व बेंगळूर दक्षिणमध्ये प्रत्येकी 2, मंडय़ा 4, उडुपी व हासनमध्ये प्रत्येकी 3, कोडगू व कारवार प्रत्येकी 5, चिक्कमंगळूर आणि चित्रदुर्ग जिल्हय़ात प्रत्येकी 7 कोरोनाबाधित विद्यार्थी परीक्षेसाठी हजर झाले होते. त्याचप्रमाणे 2,817 विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमध्ये राहूनच परीक्षा दिली आहे. तर परराज्यातील पण कर्नाटकात शिक्षण घेणाऱया दहावीच्या 760 विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिली आहे.
आपण स्वतः बेंगळूरमधील 15 परीक्षा केंद्रांना भेट देऊन पाहणी केली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व जिल्हय़ांमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत सीईओ, आमदार, मंत्र्यांनीही परीक्षा केंद्रांना भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.
यंदा परीक्षेसाठी नोंदणी केलेल्यांपैकी 99.64 टक्के विद्यार्थी सोमवारच्या परीक्षेला हजर झाले. मागील वर्षी 98.30 टक्के विद्यार्थी हजर झाले होते. कोरोना परिस्थितीतही जिल्हा प्रशासन, शिक्षण खाते, आरोग्य खाते व इतर खात्यांच्या सहकार्यातून परीक्षेसाठी सज्जता ठेवण्यात आल्यामुळे मागील वर्षीपेक्षा यंदा परीक्षेला हजर राहणाऱया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परीक्षा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व अधिकारी आणि शिक्षकांना धन्यवाद देत असल्याचे शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार म्हणाले.
मंगळूरमध्ये परीक्षा केंद्रात आग
कोरोना परिस्थितीतही अत्यंत सुरक्षित वातावरणात राज्यात दहावी परीक्षेला सोमवारी प्रारंभ झाला. मात्र, मंगळूरमध्ये परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने एका परीक्षा केंद्रामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सुदैवाने यामुळे कोणालाही धोका पोहोचला नाही. मंगळूर जिल्हय़ातील उळ्ळालनजीकच्या बब्बुकट्टे येथील हिरा महिला कॉलेजमधील परीक्षा केंद्रातील जीवशास्त्र विभागाच्या लॅबमध्ये 10ः30 च्या सुमारास आग लागली. या लॅबमधून धूर येत असल्याचे निर्शनास येताच तेथील कर्मचाऱयांनी परीक्षा देणाऱया 208 विद्यार्थ्यांना कॉलेजच्या पहिल्या मजल्यावर पाठवून परीक्षेची व्यवस्था केली. तर तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या अग्नीशमन जवानांनी आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच मंगळूर शहर पोलीस आयुक्त एन. शशीकुमार यांनी या कॉलेजला भेट देऊन पाहणी केली. आगीच्या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.
परीक्षार्थींची आकडेवारी…
गणित
- नोंदणी केलेले विद्यार्थी……. 8,52,191
- हजर विद्यार्थी…… 8,49,199
- गैरहजर विद्यार्थी.. 2992
- यंदाची हजेरी……. 99.64 टक्के
- मागील वर्षाची हजेरी……….98.30 टक्के
विज्ञान
- नोंदणी केलेले विद्यार्थी………8,43,976
- हजर विद्यार्थी…… 8,40,849
- गैरहजर विद्यार्थी.. 3,127
- यंदाची हजेरी……. 99.62 टक्के
- मागील वर्षाची हजेरी……..98.36 टक्के
समाज
- नोंदणी केलेले विद्यार्थी…….. 8,24,689
- हजर विद्यार्थी…… 8,21,822
- गैरहजर विद्यार्थी.. 2,867
- यंदाची हजेरी……. 99.65 टक्के
- मागील वर्षाची हजेरी……98.43 टक्के