सीबीएसई बारावीची परीक्षा होणारच ः उच्चस्तरीय बैठकीनंतर स्पष्ट संकेत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रलंबित असलेल्या बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट संकेत रविवारच्या केंद्रीय पातळीवरील उच्चस्तरीय बैठकीनंतर मिळाले. बारावीची सीबीएसईची परीक्षा होणार असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनीच स्पष्ट केले असून राज्य शिक्षण मंडळांच्या अंतर्गत होणाऱया परीक्षा घेण्याची तयारी राज्यांनी करावी, असे बैठकीत सुचविण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी येत्या दोन दिवसात म्हणजे 25 मे पर्यंत परीक्षा घेण्यासंबंधीचा विस्तृत नियोजन आराखडा केंद्राला सादर करण्याची सूचना राज्यांना केली आहे. राज्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर लवकरच केंद्र सरकार अंतिम निर्णय जाहीर करू शकते. तत्पूर्वी, पुढील आठवडय़ात आणखी एक व्हर्च्युअल बैठक घेतली जाणार असल्याचे समजते.
सीबीएसईच्या बारावी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पूर्व परीक्षांबाबत उच्चस्तरीय बैठक पार पडली. भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांची, शिक्षण सचिवांची आणि राज्य परीक्षा बोर्डांच्या अध्यक्षांची या बैठकीला उपस्थिती होती. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बोलाविलेल्या या बैठकीचे अध्यक्षस्थान संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भूषविले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि प्रकाश जावडेकर हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याबाबत राज्य सरकारांच्या अखत्यारीत येणाऱया परीक्षा मंडळाकडून अभिप्राय आणि सविस्तर अहवाल मागवण्यात आले आहेत.
सुरक्षा आणि भविष्य दोन्हीही महत्त्वाचे!
कोरोनाच्या दुसऱया लाटेत देशाला मोठा फटका बसला आहे. रुग्णसंख्या कमी होत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढत आहे. याच दरम्यान देशात कोरोना काळातच बारावीच्या परीक्षा घेण्याची शक्मयता आहे. बैठकीमध्ये बहुतांश राज्यांनी बारावीच्या परीक्षा घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत मांडले. कारण यावरच विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून आहे, असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि भविष्य दोन्हीही महत्त्वाचे असल्याने योग्य निर्णय घेण्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षणमंत्री निशंक यांनी केले. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि सहकारी कर्मचाऱयांची काळजी घेणेही क्रमप्राप्त असल्याचे ते पुढे म्हणाले.
सीबीएसई-बारावीसंबंधी 1 जूनला घोषणा अपेक्षित
सीबीएसई मंडळांतर्गंत घेतल्या जाणाऱया बारावी परीक्षेसंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल, असे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. ही परीक्षा कधी होणार, कोणत्या पद्धतीने घेतली जाणार याबाबतची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री जूनच्या प्रारंभी करण्याची शक्मयता आहे. विशेषतः 1 जून रोजी 12 वीच्या सीबीएससी परीक्षांच्या तारखेची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक व इतरांकडून समाजमाध्यमातून परीक्षा आयोजनासंबंधीचे म्हणणे मागवले होते.
कोरोना नियमावली पाळून परीक्षा घेण्याचे नियोजन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वषी कोरोनाच्या नियमावलीत ज्या प्रकारे जुलैमध्ये परीक्षा झाली होती, त्या प्रमाणेच यंदाही परीक्षांचे आयोजन केले जाऊ शकते. केंद्राकडून सर्व राज्यांना याबाबत आवाहन करण्यात आले आहे. येत्या 3 दिवसात सर्व राज्यांनी परीक्षांबाबत त्यांचे निर्णय लिखित स्वरुपात शिक्षण मंत्रालयाला पाठवावेत. यानंतरच 1 जूनपर्यंत यावर निर्णय घेण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे. बैठकीमध्ये राज्यांनी वेगवेगळे प्रस्ताव सुचवले आहेत.
विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची शिसोदियांची मागणी
बैठकीत काही राज्यांनी कोरोनाची परिस्थिती पाहता बारावीची परीक्षादेखील रद्द करण्याची मागणी केली. यामध्ये दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष शिसोदिया यांनी ठामपणे भूमिका घेतली. बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करा, अथवा परीक्षा रद्द करा, अशी मागणी देखील त्यांनी केली.