स्मार्ट सिटीच्या अधिकारी-कंत्राटदारांना मराठी भाषेची कावीळ : फलक कानडी-इंग्रजी भाषेत लावल्याने नागरिकांतून नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात विविध चौक आणि प्रमुख मार्गांवर महापालिकेच्यावतीने ठिकठिकाणी मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेतील दिशादर्शक फलक लावले होते. मात्र, आता स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकास करण्यात आलेल्या रस्त्यांवर फक्त कानडी व इंग्रजी भाषेत फलक लावण्यात आल्याने मराठीसह अन्य भाषिक नागरिकांची गैरसोय होत आहे. स्मार्ट सिटीच्या अधिकारी व कंत्राटदारांना मराठी भाषेची कावीळ झाली आहे का, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
शहरातील विविध रस्त्यांवर व चौकात नामफलक आणि दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. मात्र, नागरिकांना फलक वाचणे अडचणीचे बनले आहे. यापूर्वी कन्नड, इंग्रजी आणि मराठी अशा विविध भाषांमध्ये हे फलक लावण्यात आले होते. पण आता स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकास करण्यात आलेल्या रस्त्यांवर लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांवरील मराठी भाषा हद्दपार झाली आहे. शहराचा विकास महत्त्वाचा असल्याने भाषिकवाद नको, अशा प्रतिक्रिया लोकप्रतिनिधी आणि अधिकारी व्यक्त करीत असतात. पण शहरात मराठी भाषिकांची संख्या जास्त असूनही महापालिका कार्यालयात कानडीकरणाचा वरवंटा फिरविण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे. यामुळे भाषावाद नको म्हणणारे लोकप्रतिनिधी व अधिकारीच भाषाभेद का करतात? असा प्रश्न मराठी भाषिक जनता उपस्थित करीत आहे.
सरकारी कामकाज कानडी भाषेत करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. पण शहरातील नागरिकांना समजणाऱया भाषेत कागदपत्रे व माहिती देण्याची जबाबदारी सरकारची आहे. भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनेनुसार आणि भारतीय संविधानानुसार प्रत्येक भाषिकाला त्यांच्या भाषेत माहिती देणे बंधनकारक आहे. पण कानडीकरणाच्या नावाखाली नागरिकांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार राज्य शासन आणि सरकारी अधिकारी करीत आहेत.
शहराच्या हद्दीवर फलक लावण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. यापूर्वी शहरातील चौकात, रस्त्यांवर, उद्यान तसेच महत्त्वाच्या ठिकाणी तिन्ही भाषेतील नामफलक लावण्यात आले आहेत. मात्र, महापालिकेच्यावतीने नव्याने लावण्यात आलेल्या फलकांवरून मराठी भाषा हद्दपार करण्यात आली आहे. सध्या विविध चौकात दिशादर्शक फलक लावण्यात येत असून केवळ कन्नड आणि इंग्रजी भाषेतील फलक लावले आहेत. स्मार्ट सिटी ही योजना केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात आली आहे. पण योजनेंतर्गत लावलेल्या दिशादर्शक फलकांवर केवळ दोन भाषांचा वापर केला जात आहे. राणी चन्नम्मा चौक, संगोळ्ळी रायण्णा चौक, धर्मवीर संभाजी चौक आणि राजेंद्र प्रसाद चौकात दिशादर्शक फलक महापालिकेने लावले आहेत. पण यावर मराठी भाषेमधून मजकूर लिहिण्यात आला नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. फलक लावण्याचे कंत्राट महापालिकेच्या अधिकाऱयांच्या मर्जीतील कंत्राटदाराला दिले आहे. यामुळे मराठी भाषेची कावीळ मनपा अधिकाऱयाला की कंत्राटदाराला आहे, अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
अधिकाऱयांकडूनच भाषाभेद…
वास्तविक पाहता गोवा आणि महाराष्ट्र राज्यांतील नागरिक बेळगाव बाजारपेठेत येत असतात. विशेषतः चंदगड, आजरा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, गोवा अशा शहरांतील मराठी भाषिक खरेदी-विक्रीकरिता बेळगाव बाजारपेठेत येतात. त्यामुळे हद्दीवर लावण्यात आलेल्या फलकांवर मराठी भाषेतून माहिती देणे आवश्यक आहे. मात्र, महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱयांनी भाषाभेद चालविला असल्याचा आरोप शहरवासीय करीत आहेत.