प्रतिनिधी/ फोंडा
गोव्यातील भाजपा सरकारच्या ढिसाळ धोरणामुळे म्हादई लढा कमकुवत झालेला आहे. येत्या काळात दुधसागर धबधब्याला जोडणाऱया नद्या कर्नाटक सरकार वळविण्याचा प्रयत्न करील तेव्हा असेच धोरण अवलंबल्यास राज्यातील शेती बागायती ओस पडून गोव्यातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागेले अशी परिस्थिती उद भवण्याची भिती मडकईचे आमदार तथा माजी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केली आहे.
समस्त गोयकरांच्या हिताच्या प्रश्नांना दिल्लीतून कारभार हाकणारे पक्ष न्याय देऊ शकणार नसून त्यासाठी स्थानिक मगो पक्ष योग्य लढा देण्यास सक्षम भूमिका घेत आलेला आहे. त्यासाठी गोव्याच्या जनतेने येत्या निवडणूकीत मगो पक्षाला निवडून द्यावे असे आवाहनही ढवळीकर यांनी केले आहे.
रेल्वे दुपदरीकरणाला नव्हे, केवळ कोळसा वाहतूकीला विरोध हवा
गोव्यात रेल्वेचे दुपदरीकरण कोळसा वाहतूकीसाठी मूळीच नको. रेल्वे दुपदरीकरण सिमेंट, धान्य व प्रवासी वाहतूकीसाठी अत्यावश्यक आहे. दुपदरीकरणानंतर सिमेंट, धान्य स्वस्त दरात उपलब्ध होईल, असे भाकित केले असून रेल्वे दुपदरीकरणाचा विरोध करून काहीच साध्य होणार नाही. केवळ अदानीच्या कर्नाटक येथील थर्मल प्रकल्पासाठी कोळसावाहतूक करण्यासाठी दुपदरीकरण होत असेल तर आपला कायम विरोध असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे.
म्हादईप्रश्नी मगोची ठाम भूमिका 1978 पासून
म्हादई लढयात मगो पक्षाने आजपर्यंत ठाम भूमिका घेतलेली आहे. 17 वर्षाच्या सत्तेत मगोने पक्षाच्या 1978 सालापासून म्हादईचे एक इंचही पाणी कर्नाटक सरकारला वळवू दिलेले नाही. याउलट 2006 साली कॉग्रेसच्या कार्यकाळात कळसा भंडूरा कालवा उभारण्याचे काम सुरू झाले. त्यानंर 2018 साली भाजपा सरकारच्या कार्यकाळात मलप्रभा नदीतील पाणी वळविण्यात आले. यावेळी आपण कॅबिनेट मंत्री असल्यामुळे योग्य भूमिका घेणे जड गेले. मात्र तरीही आपण याप्रकरणी वारंवार पत्रव्यवहार करून जागृती केली होती. यावरून दिल्लीतील पक्ष राज्यात कारभार व्यवस्थितपणे हाकण्यास अयशस्वी ठरत आहे. त्यासाठी गोव्याच्या मातीतील पक्ष मगो पक्षच म्हादईप्रश्नी योग्य भूमिका घेऊ शकतो असे ते म्हणाले.
दिल्लीच्या वीज बिलांचे गोडवे नको, पाण्याच्या बिलांचे काय
दिल्लीतील वीज दराबाबत गोडवे गाऊ नका, पाण्याबाबतही सत्यपरिस्थिती दाखवा असे आव्हान ढवळीकर यांनी दिले आहे. केणीही दिल्लीहून येऊन गोव्याबाबत उलटसुलट बोलून जातो, हे कदापी सहन केले जाणार नाही. गोव्याच्या आमदार मंत्र्यांनी आज रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभाग, कुणाही कार्यकर्त्याबरोबर खुली चर्चा असे सत्र अनुभवलेले आहे. सरकारात असलेल्या मंत्र्यांनी मंत्रीपदाची शान राखावी, असा सल्ला आमदार सुदिन ढवळीकर यांनी भाजपा सरकारला दिला.
जिल्हा पंचायत निवडणूकीच्या तारेखेसह कार्यक्रम जाहीर करा, कारण यंदाच्या जि.प. निवडणूक पक्षपातळीवर होत असून सर्व पक्षांना कोपरा बैठका व प्रचारासाठी वेळ मिळू द्या असे सरकारला सुचविले आहे. पक्षबैठका घेण्यासाठी भाजपाला संमती इतर पक्षांना मनाई असे धोरण योग्य नव्हे. सर्व पक्षांना समांतर संधी मिळू द्या. मडकई मतदार संघात 2 कोटी 29 लाख खर्चुन 300 मि.मि. जीआय जलवाहिनीचा शुभारंभ करण्यात आला. मात्र यावेळी काही विघ्नसंतोषी लोकांनी बांधकाम मंत्र्यांशी हुज्जत घालण्याचा प्रकार निषेधार्थ आहे. या जलवाहिनीचा लाभ मडकई भागातील म्हार्दोळ, महालवाडा, बांदोडा, आकसणवाडा या भागांना होणार असल्याचे त्यानी निदर्शनास आणू दिले. अशा विघ्नसंतोषी लोकांवर लक्ष ठेवू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.