ईडीच्या कारवाईने देशमुखांपुढील अडचणी वाढल्या
प्रतिनिधी/मुंबई
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असलेली 4.20 कोटीची मालमत्ता ईडीने शुक्रवारी जप्त केली आहे. पीएमएलए अंतर्गत तात्पुरत्या स्वरुपात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मनी लाँड्रिग प्रकरणी सध्या त्यांची ईडीमार्फत चौकशी सुरु आहे. मात्र शुक्रवारी ईडीने त्यापुढील पाऊल उचलून कारवाई केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर बडतर्फ पोलीस अधिकारी वाझे याच्या माध्यमातून देशमुख यांना 4.70 कोटी लाच स्वरुपात मिळाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचा दावाही ईडीने केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी वसुलीचे टार्गेट वाझे याला दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हायकोर्टाच्या निर्देशानुसार अनिल देशमुख व त्यांच्या कुटुंबियांची ईडी व सीबीआयमार्फत सध्या चौकशी सुरू आहे. याप्रकरणी सीबीआयने मूळ गुन्हा दाखल केला असून त्याच अनुषंगाने मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख व कुटुंबियांची 4.20 कोटी रुपयांची मालमत्ता शुक्रवारी जप्त करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेली मालमत्ता त्यांची पत्नी आरती देशमुख आणि प्रीमियर पोर्ट लिंक्स कंपनीच्या नावावर आहे. यात वरळी येथील 1.54 कोटी रुपये किंमतीचा फ्लॅट आणि उरण (रायगड) येथील धुतूम गावातील 2.67 कोटी किंमतीच्या जमिनीचा समावेश आहे. पीएमएलए अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, असे ईडीच्यावतीने सांगण्यात आले.
वरळी येथील फ्लॅट आरती देशमुख यांच्या नावावर असून 2004 मध्ये या फ्लॅटची पूर्ण रक्कम रोकड स्वरूपात देण्यात आली होती. प्रत्यक्षात फेब्रुवारी 2020 मध्ये देशमुख हे गृहमंत्री असताना या फ्लॅटचा विक्री व्यवहार करण्यात आला, असे ईडीच्या तपासात आढळले आहे. गृहमंत्री असताना त्यांनी सचिन वाझेच्या माध्यमातून ऑर्केस्ट्रा बार मालकांकडून 4.70 कोटी इतकी रक्कम लाच स्वरूपात मिळवल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचा दावाही ईडीने केला आहे.
दिल्ली स्थित डमी कंपन्यांच्या मदतीने देशमुख यांनी मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून 4.18 कोटी रुपये आपल्या ट्रस्टसाठी मिळवले. ही रक्कम श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यात दाखवण्यात आली, असा दावाही ईडीकडून करण्यात आला आहे. देशमुख कुटुंबियांकडे प्रीमियर पोर्ट लिंक्स कंपनीची 50 टक्के मालकी आहे. या कंपनीच्या नावे जमीन, दुकाने अशी मिळून 5.34 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. या कंपनीची मालकी देशमुख कुटुंबाने केवळ 17.95 लाख रुपयांच्या बदल्यात मिळवल्याचा दावाही ईडीकडून करण्यात आला आहे.
आरती देशमुख यांच्यावतीने ईडीला कागदपत्रे सादर
ईडीने आरती देशमुख यांना पाठवलेल्या समन्समध्ये त्या प्रतिनिधी मार्फत संबंधीत कागदपत्र ईडी कार्यालयात जमा करू शकतात, असे म्हटले होते. त्यानुसार शुक्रवारी त्यांच्यावतीने त्यांच्या प्रतिनिधींनी ही कागदपत्रे जमा केली असल्याचे ऍड. इंदरपाल सिंग यांनी सांगितले. आम्ही ईडीला तपासात संपूर्ण सहकार्य करत आहोत व यापुढेही तपास यंत्रणांना आमचे पूर्ण सहकार्य असेल. आमच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असेही त्यांनी सांगितले.