नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात 24 तासात 1 लाख 94 हजार 720 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तसेचग्न दिवसभरात 60 हजार 405 लोक बरे झाले असून 442 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण आणि डिस्चार्ज मिळणाऱयांच्या आकडय़ात मोठा फरक पडल्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 1 लाख 32 हजारहून अधिक वाढ झाली आहे. सध्या देशात 9 लाख 55 हजार 319 इतके सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाच्या तिसऱया लाटेत सक्रिय रुग्णांची संख्या प्रथमच 9 लाखांच्या पुढे गेली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात एकूण 3.60 कोटी लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. एकूण बाधितांपैकी 3.46 कोटी लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत 4 लाख 84 हजार 655 लोकांचा मृत्यू झाला आहे. दैनंदिन बाधितांचा आकडा आता जवळपास 2 लाखांच्या आसपास पोहोचला आहे. यापूर्वी सोमवारी 1.69 लाख लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले होते.
देशातील 8 राज्यात संसर्ग जोरात
कोरोनाच्या तिसऱया लाटेदरम्यान आठ राज्यांमध्ये संसर्ग जोरात सुरू असल्याचे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. त्यानुसार सकारात्मकतेचे प्रमाण जास्त असलेल्या राज्यांची नावेही दिली आहेत. महाराष्ट्र, बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये सध्या सर्वाधिक रुग्ण आहेत. या राज्यांपैकी पश्चिम बंगालमध्ये 32.18 टक्के इतका सर्वाधिक सकारात्मकता दर आहे. त्यापाठोपाठ दिल्ली 23.1 टक्के आणि महाराष्ट्र 22.39 टक्के इतका सकारात्मकता दर नोंद झाल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.