राजस्थान-उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक प्रमाण : एनसीआरबी अहवाल
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्काराचे राजकारण तीव्र झाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यानंतर तृणमूल नेत्यांची अडवणूक झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्था कोलमडली असल्याचा आरोप होऊ लागला आहे. हा आरोप राजकीय असला तरी एनसीआरबीच्या अहवालानुसार उत्तर प्रदेशमधील महिलांवरील गुह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच एकंदर आकडेवारीवरून देशात एका दिवसाला महिलांशी संबंधित गुन्हय़ांच्या 88 घटना घडत असल्याचे दिसून येत आहे.
एनसीआरबी म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या गुन्हेगारी अहवालात महिलांविरुद्धची प्रकरणे 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये 7.3 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे. सरकारी अहवालात ही संख्या कमी होत असल्याचे दिसून आले असले तरी काही राज्यांमधील आकडेवारी मात्र अधिकच वाढलेली दिसते. यामध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थान ही दोन राज्ये आघाडीवर आहेत. गेल्या तीन वर्षांत महिलांवरील गुह्यांमध्ये उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. 2017 मध्ये 56,011 प्रकरणे नोंदविण्यात आली, तर 2018 मध्ये 59,445 आणि 2019 मध्ये 59,853 प्रकरणे नोंदली गेली. देशभरातील महिलांवरील गुह्यांमध्ये आज उत्तर प्रदेशचा वाटा 14.7 टक्के इतका आहे. मात्र, राजस्थानची आकडेवारी धक्कादायक आहे. 2017 मध्ये राजस्थानात 25,993 तर 2018 मध्ये 27,866 प्रकरणे नोंदली गेली होती. परंतु 2019 मध्ये त्यात 33 टक्क्यांनी वाढ होत एकूण गुन्हय़ांचा आकडा 41,550 वर पोहोचला आहे.