ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात पहिल्यांदाच ग्रीन हायड्रोजन इंधनावरील कार धावली. पर्यायी इंधनाचा पुरस्कार करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज ग्रीन हायड्रोजनवरील ‘टोयोटा मिराई’ कारमधून संसदेत दाखल झाले. भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी आम्ही पाण्यापासून तयार होणारा ग्रीन हायड्रोजन सादर केला आहे. ही कार एक पायलट प्रोजेक्ट आहे. लवकरच देशात ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन सुरू होईल, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
गडकरी म्हणाले, जगभरात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे स्वच्छ इंधनाची गरज आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण ग्रीन हायड्रोजन इंधनाचा वापर करण्याचं ठरवलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीला ग्रीन हायड्रोजन सर्वात मोठा पर्याय आहे. त्याचा खर्च प्रति किलोमीटर 2 रुपये येईल. केंद्र सरकारने 3000 कोटी रुपयांचे मिशन सुरू केले असून, देश हायड्रोजन निर्यात करणारा देश बनेल. जिथं कोळशाचा वापर होतो तिथं ग्रीन हायड्रोजन इंधनाचा वापर होईल.
‘मिराई’ ही कार जपानच्या टोयोटा कंपनीची असून, ग्रीन हायड्रोजन इंधन फरिदाबादस्थित इंडियन ऑईल पंपाचे आहे. ही कार इंधन भरल्यानंतर जवळपास 600 किलोमीटर अंतर पार करू शकते, असेही गडकरी यावेळी म्हणाले.