ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मागील आठवडाभरापासून देशात बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. परदेशातील कोरोनाचे तीन नवे स्ट्रेन भारतात दाखल झाले असले तरी देखील कोरोनाच्या विषाणूमध्ये जनुकीय बदल झाल्यामुळे ही वाढ होत असावी. तसेच लोकांचा निष्काळजीपणा हेही रुग्णवाढीमागचे कारण असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते.
ब्रिटिश कोरोनानंतर भारतात दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील आणखी दोन नवे स्ट्रेन आढळून आले आहेत. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी 6,112 रुग्ण आढळले असून, 4 डिसेंबरनंतर प्रथमच रुग्ण संख्या 6 हजारांच्या वर गेली आहे. दहा दिवसांच्या आत रुग्णसंख्या दुप्पट झाल्याने महाराष्ट्राचीही चिंता वाढली आहे. केरळमध्येही काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, भारतात मागील 24 तासात 13 हजार 993 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 101 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 09 लाख 77 हजार 387 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 56 हजार 212 एवढी आहे. देशात आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 1 कोटी 07 लाख 15 हजार 204 लोकांना लस देण्यात आली आहे.
शुक्रवारी 10,307 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 06 लाख 78 हजार 048 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 43 हजार 127 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.