प्यू रिसर्चच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतात सध्या धर्मांतराच्या मुद्दय़ावरून राजकीय वातावरण तापलेले असताना एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणानुसार देशात सर्वाधिक धर्मांतर हिंदूंचेच झाले आहेत. ख्रिश्चन धर्माचा अवलंब करणाऱया लोकांची यात सर्वाधिक संख्या असल्याचे प्यू रिसर्च सेंटरने म्हटले आहे. सर्वेक्षणात सामील 0.4 टक्के लोक पूर्वी हिंदू होते, तर केवळ 0.1 टक्के लोक आधी ख्रिश्चन होते.
या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार भारतात ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱयांपैकी 74 टक्के लोक दक्षिणेतील राज्यांमधील आहेत. याचमुळे दक्षिणेतील राज्यांमध्ये ख्रिश्चनधर्मीयांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. सर्वेक्षणात सामील 6 टक्के दक्षिण भारतीयांनी आपण जन्मापासून ख्रिश्चन असल्याचे नमूद केले. तर 7 टक्के लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे म्हटले आहे.
अनुसूचित जातींमध्ये सर्वाधिक धर्मांतर
धर्मांतर करणाऱयांपैकी जवळपास निम्मे लोक हे अनुसूचित जातींशी संबंधित आहेत. धर्मांतर करून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱयांपैकी निम्मे हे अनुसूचित जातीतील होते. तर 14 टक्के अनुसूचित जमाती, 26 टक्के ओबीसीमधील असल्याचे सर्वेक्षणाच्या निष्कर्षात म्हटले गेले आहे. हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱयांपैकी 45 टक्के लोकांनी भारतात विशेषकरून अनुसूचित जातीसोबत भेदभाव केला जातो, हेच धर्मांतराचे कारण असल्याचे मत व्यक्त केले आहे.
लोकसंख्यात फारसा फरक नाही
प्यू रिसर्च सेंटरनुसार धर्मांतरामुळे कुठल्याही धर्माच्या लोकसंख्येवर विशेष परिणाम झालेला नाही. सर्वेक्षणात सामील 81.6 टक्के लोकांनी आपला जन्म हिंदू धर्मात झाल्याचे सांगितले. तर 81.6 टक्के लोकांनी सद्यस्थितीत हिंदू असल्याचे म्हटले आहे. याचप्रमाणे 11.2 टक्के लोकांनी आपला जन्म मुस्लीम धर्मात झाल्याचे म्हटले. तर तितक्याच लोकांनी आपण सध्या मुस्लीम असल्याचे नमूद केले आहे. 2.3 टक्के लोकांनी ख्रिश्चन म्हणून जन्मल्याचे सांगितले. तर 2.6 टक्के लोकांनी सद्यस्थितीत ख्रिश्चन असल्याचे म्हटले आहे.