प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर तालुक्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस व आरोग्य खात्याने विशेष दक्षता घेतली आहे. या संदर्भात सोमवारी नंदगड, रामापूर व बागेवाडी येथील 20 जणांना ताब्यात घेऊन त्यांना सरकारी क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यासाठी खैरवाड येथील संगोळ्ळी रायण्णा निवासी शाळेत खास व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी आरोग्य खाते व पोलिसांची नजर ठेवण्यात आली आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती अशी, नंदगडमधील एका परिवारातील दोघेजण हिरेबागेवाडी येथे एका वृद्ध महिलेच्या अंत्यविधीला उपस्थित होते. एवढेच नव्हे तर संबंधित वृद्ध महिला सिरीयस असल्याने तिला पाहण्यासाठी दोघेही गेले होते. त्या दिवशी त्या घरात त्यांनी मुक्कामही केला. दुसरे दिवशी सकाळी या महिलेचे निधन झाल्याने अंत्यविधी उरकुनच ते नंदगडला परतले होते. तर आणखी एका परिवारातील व्यक्तीला अर्धांगवायुचा झटका आला. यामुळे त्याला पाहण्यासाठी हिरेबागेवाडीहून एक महिला व पुरुष नंदगडला आले होते. विशेष म्हणजे हिरेबागेवाडी येथ आतापर्यंत कोरोनाचे चार रुग्ण सापडले असल्याने हिरेबागेवाडी परिसर सिलबंद करण्यात आला आहे. अशा परिस्थितीतही नंदगडमधील दोन परिवारामधील व्यक्तीनी हिरेबागेवाडी येथे ये-जा केली होती. याचा सुगावा आरोग्य खात्याला व पोलिसांना लागला. यामुळे सोमवारी सकाळी तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस व आरोग्य खात्याच्या पथकाने त्या दोन्ही परिवाराशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली व सर्वांना संगोळळ रायण्णा निवासी शाळेमध्ये सरकारी क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यामध्ये त्या दोन परिवारासह त्यांच्याशी संबंधित असलेल्या रामापूर व हिरेबागेवाडी येथील काही जणांचाही त्यामध्ये समावेश असल्याचे समजते. आरोग्य खात्याने या सर्वांच्या अधिक तपासणीसाठी प्रत्येक व्यक्तीच्या घशातील द्राव घेतला असून तो अधिक तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, खानापूर तालुक्यात आता गव्हर्न्मेंट क्वॉरंटाईनमध्ये असलेल्यांची संख्या 24 झाली आहे. त्यामध्ये खानापूर येथील विद्यार्थी वसतिगृहात ठेवलेल्या दोघांचा समावेश आहे. खानापूर तालुक्यात याआधिच परदेशातून आलेल्या 81 लोकांचे तसेच परप्रांतातून व परराज्यातून आलेल्या 5 हजार लोकांचे होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी परदेशातून आलेल्या 81 जणांच्यावर आरोग्य खात्याने विशेष नजर ठेवली आहे..