प्रतिनिधी/ बेळगाव
नंदिहळ्ळी परिसरातून बागलकोट रेल्वेमार्ग जाणार आहे. त्याचा सर्व्हे करून विविध ठिकाणी दक्षिण पश्चिम रेल्वेचे खांब रोवण्यात आले आहेत. त्यामुळे नंदिहळ्ळी परिसरामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सुपीक जमिनीमध्ये हे खांब रोवल्यामुळे आता शेतकऱयांना त्याविरोधात आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
बेळगाव-बागलकोट रेल्वेमार्ग तयार करण्याबाबत रेल्वे विभागाने तयारी सुरू केली आहे. त्याबाबत यापूर्वी नंदिहळ्ळी परिसरात सर्व्हे करण्यात आला होता. त्यानंतर आता खांब रोवून त्यावर दक्षिण पश्चिम रेल्वे क्रमांक दाखल करण्यात आला आहे. जवळपास 200 फूटहून अधिक जमीन घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नंदिहळ्ळी परिसरातील ही जमीन अत्यंत सुपीक आहे. असे असताना या जमिनीमधून रेल्वेमार्ग जात असल्याने शेतकऱयांमध्ये खळबळ उडाली आहे.
नंदिहळ्ळी येथील ही जमीन तिबारपिकी आहे. मात्र, आता रेल्वे प्राधिकरणचे कर्मचारी मोजमाप करून खांब रोवत आहेत. त्याला विरोध करण्यासाठी शेतकऱयांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सुपीक जमीन गेली तर आम्ही जगायचे कसे? असा सवाल शेतकऱयांनी उपस्थित केला आहे.