राजू धुळी यांची मागणी : घाटमाथ्यावरील सात तालुक्यांसाठी स्वतंत्र जिल्हय़ाची निर्मिती करणे गरजेचे
प्रतिनिधी / कारवार
कारवार जिल्हय़ाचे विभाजन करून घाटमाथ्यावरील हल्याळ, जोयडा, दांडेली, शिरसी, सिद्धापूर, यल्लापूर आणि मुंदगोड या पाच तालुक्यांचा समावेश असलेल्या स्वतंत्र जिल्हय़ाची निर्मिती करावी आणि या स्वतंत्र जिल्हय़ाचे मुख्यालय (केंद्र) म्हणून हल्याळची घोषणा करावी, अशी मागणी हल्याळ जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू धुळी यांनी केली. संघर्ष समिती आणि हल्याळ तालुक्यातील वेगवेगळय़ा 35 संघ-संस्थांच्या पदाधिकारी आणि सदस्य यांच्यावतीने येथील पत्रकार भवनात पत्रकारांशी बोलताना धुळी पुढे म्हणाले, हल्याळ तालुक्याचा कारवार जिल्हय़ात समावेश होत असून जिल्हा मुख्यालय कारवार येथे आहे. कारवार जिल्हय़ात 12 तालुक्यांचा समावेश असून भौगोलिकदृष्टय़ा हा जिल्हा सर्वात मोठा मानला जातो. हल्याळसह जिल्हय़ातील काही तालुके आणि जिल्हा मुख्यालय बनून राहिलेल्या कारवार दरम्यानचे अंतर 130 ते 150 कि. मी. इतके आहे. कारवारला काही कामासाठी जायचे झाल्यास रस्त्याने किमान चार ते पाच तासांचा प्रवास करावा लागतो. कारण काही रस्ते घनदाट जंगलातून जातात. तर अन्य काही रस्त्यावरील प्रवास अनेक वळणांचा आहे. सरकारी कार्यालयातील एखादे काम करून घ्यायचे असल्यास किमान दोन दिवस लागतात. त्यासाठी दोन दिवसांची रजा घ्यावी लागते किंवा दोन दिवस व्यवसाय बंद ठेवावे लागतात. एखाद्या कामासाठी कारवारला जावे आणि त्या दिवशी सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसले तरी नागरिकांच्या अडचणीत अधिक भर पडते. जनतेचे त्रास आणि हाल वाचविण्यासाठी तसेच वेळ, पैसा आणि ऊर्जेचा अपव्यय टाळण्यासाठी कारवार जिल्हय़ाचे विभाजन करून घाटमाथ्यावरील सात तालुक्यांसाठी स्वतंत्र जिल्हय़ाची निर्मिती करणे गरजेचे आहे. आणि या नवीन जिल्हय़ाचे मुख्यालय (केंद्र) हल्याळ येथेच असले पाहिजे, अशी आग्रही मागणी राजू धुळी यांनी केली.
हल्याळ येथेच नवीन जिल्हय़ाचे मुख्यालय का हवे?
कारवार जिल्हय़ाचे विभाजन करून स्वतंत्र जिल्हय़ाचे मुख्यालय हल्याळ येथेच का झाले पाहिजे, याबद्दल माहिती देताना धुळी म्हणाले, हल्याळनगरात 24ƒ7 निरंतर पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. मोठय़ा प्रमाणात कृषी भूमी असलेल्या कारवार तालुक्यात आंबा, ऊस, भात, मका, कापूस आदी नगदी पिके पिकविली जातात. हल्याळजवळ साखर कारखाना असून या कारखान्यामुळे बेरोजगार व शेतकऱयांना आर्थिक सदृढता प्राप्त झाली आहे. जिल्हय़ातील अधिक लोकवसती योग्य प्लॉट्स लेआऊट हल्याळ येथे उपलब्ध आहेत. हल्याळ येथे हायटेक सरकारी रुग्णालय कार्यरत असून सरकारी इमारती उभारण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. हल्याळ येथे जिल्हास्तरीय जेलच्या इमारतीची उभारणी होत असून येथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. हल्याळपासून 12 कि.मी. अंतरावरील अळणावर येथे रेल्वेस्थानक तर 50 कि.मी. अंतरावर हुबळी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हल्याळ येथे कोर्ट, कुस्ती आखाडा असून औद्योगिक विकास घडवून आणण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. हल्याळ येथे जिल्हा मुख्यालय केल्यास अरण्य किंवा वन्यजीवांना कोणताही धोका नाही. हल्याळ, जिल्हय़ाचे मुख्यालय करण्यास योग्य स्थळ असून विभाजन केलेल्या जिल्हय़ाचे मुख्यालय हल्याळ येथे व्हावे, असे धुळी यांनी सांगितले.