‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नवतरुणांची मते, गरजा आणि आशा-अपेक्षा लक्षात घेऊन देशाचे नवीन शैक्षणिक धोरण तयार केले आहे. तरुणांच्या कलेला संधी मिळावी यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू असून त्या अनुषंगाने पुढील काळात मार्गक्रमण करावे लागणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 च्या अंतिम फेरी सोहळय़ाला संबोधित करताना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलत होते.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हे संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ आहे. या व्यासपीठामुळे दैनंदिन जीवनात येणाऱया समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत आहे, असेही पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले. भारतातील शिक्षणाला अधिक आधुनिक करण्यासह नव्या पिढीतील प्रतिभेला वाव देण्याची पूर्ण संधी देण्याच्या उद्देशाने शिक्षण पद्धतीत बदल करण्यात आला आहे. तरुणांच्या कलेला संधी मिळावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. गेल्या शतकात भारताने एकापेक्षा अधिक उत्कृष्ट वैज्ञानिक, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञ, तंत्रज्ञान, उद्योजक दिले असल्याचा उल्लेख करत आताही देशाच्या विकासात तरुणांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हे सर्वप्रथम 2017 मध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी 42,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर 2018 मध्ये विद्यार्थ्यांची संख्या लाखांवर पोहोचली होती. त्यानंतर 2019 साली विद्यार्थ्यांची संख्या वाढून 2 लाखांवर पोहोचल्यानंतर सध्या दुप्पटीहून अधिक होत साडेचार लाखांवर पोहोचली आहे. सॉफ्टवेअर एडिशन्सचा भव्य समारोप समारंभ यावषी ऑनलाईन आयोजित केला आहे. त्यासाठी देशभरातील सर्व सहभागींना विशेष तयार केलेल्या आधुनिक व्यासपीठावर एकत्र आणण्यात आले आहे. या समुहाला शनिवारी पंतप्रधानांनी संबोधित केले.