पेठ वडगाव/प्रतिनिधी
मोदी सरकारने आणलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडणार असून देशात आणि राज्यात नवक्रांती घडून येणार आहे, असे प्रतिपादन माजी कृषी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यानी केले. दिल्लीतील शेतकरी कायद्याविरोधात सुरु असलेले आंदोलन हे सुविधायुक्त सुरु असून खरे शेतकरी आपल्या शेतात काम करत असून या आंदोलनात बाजार समितीचे दलाल या आंदोलनात घुसले असल्याचा आरोप खोत यांनी यावेळी केला.
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चा व रयत क्रांती संघटनेच्या किसान आत्मनिर्भर यात्रेचे पेठ वडगाव ता.हातकणंगले येथे ढोलच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. किसान आत्मनिर्भर रॅलीवेळी वाठार येथील शंकर पाटील यांच्या शेतावर सभा झाली त्यावेळी बोलत होते.
दिल्ली-पंजाबमध्ये झालेल्या उद्रेकात शेतकरी अत्यल्प आणि बाजार समित्यांशी संबंधित घटकच जास्त शिरले आहेत. त्यामुळे ते आंदोलन चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. या आंदोलनात शेतकरी हितापेक्षा बाजार समितीतील दलाल व इतर घटकांच्याच हिताचा जास्त विचार केला असल्याचा आरोप करून या आंदोलनात बाजार समितीचे दलाल घुसले असल्याचा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.
केंद्र सरकारने बनविलेल्या कृषी कायद्यांच्या माध्यमातून अखेरीस शेतकऱ्यांचे हितच साधले जाणार आहे. या कायद्यांमुळे शेतमालाच्या विक्रीसाठी जागेचे बंधन नसेल, शेतीविषयक करारांमुळे मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार असेल, बाजार समित्यांचे अस्तित्व अबाधित राहणार असून, करारांसाठी स्वतंत्र लवाद असणार आहे. या कायद्यांचे सार म्हणजे परकीय क्षेत्रातील गुंतवणूक शेती व्यवस्थेत वाढेल. यातून तंत्रज्ञानाधारित शेतीस चालना मिळून उत्पादकताही वाढीस लागणार आहे, असा दावाही खोत यांनी केला.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले प्रश्न निर्माण करायचे आणि ते भिजत ठेवायचे हे काम कॉग्रेस राष्ट्रवादीने केले आहे. आपण शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत की दलालांच्या बाजूने आहोत हे राज्याच्या नेतृत्वाने स्पष्ट करावे असे आव्हान आमदार पडळकर यांनी यावेळी केले. ही आत्मनिर्भर यात्रा इचलकरंजीहून कोरोची, हातकणंगले, आळते मार्गे सावर्डे, मिणचे येथून पेठ वडगाव व वाठार येथे आली. या रॅलीचे पेठ वडगाव शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी आमदार अमल महाडीक, भगवानराव साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य अशोक माने, अरूणराव इंगवले, प्रसाद खोबरे, जिल्हा अध्यक्ष भगवान काटे, तालुका अध्यक्ष राजेश पाटील, नाना जाधव, जगन्नाथ माने, डॉ.अशोक चौगुले, धनंजय गोंदकर, तानाजी ढाले, सुरेश पाटील यांचेसह भाजपा-रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
Previous Articleवटवृक्ष स्वामी मंदिरातील स्वामींचे दर्शन पुन्हा बंद
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.