एकाचा दुर्दैवी मृत्यू, दुसऱयाची प्रकृती चिंताजनक लाड कुटुंबियाच्या धाडसाचे कौतुक
प्रतिनिधी /वाळपई
वाळपई नगरपालिका क्षेत्रातील नाणूस बेतकेकरवाडा येथील म्हादई नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी गेलेली तीन भावंडे बुडाली. त्यातील एकाच दुर्देवी मृत्यू झाला तर दोघांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. एका भावाची प्रकृती चिंताजनक असून त्याला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलेले आहे तर तिसरा भाऊ सुखरूप असून त्याच्यावर वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे.
अधिक माहितीनुसार, संध्याकाळी 4 वा.च्या सुमारास इर्फान मकबूल शेख (15), आसिफ शेख (13) व रेहान शेख (10) ही तिन्ही भावंडे बेतकेकरवाडा येथील म्हादई नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेली होती. नदीच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तिन्ही भावंडे पाण्यात गटांगळय़ा खाऊ लागली. नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या साहिल लाड यांची आई व बहीण रंजना यांनी सदर प्रकार पाहून ताबडतोब साहिल लाड व त्यांचे काका सागर यांना बोलाविले. त्यांनी तातडीने धाव घेऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात आसिफ व रेहान यांना पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश आले तर इर्फान पाण्याच्या प्रवाहाबरोबर दूरवर वाहून गेल्याने त्याला ते वाचवू शकले नाहीत. रेहान बुडून पोटात पाणी गेल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
साहिल व सागर लाड यांनी जीवाची पर्वा न नदीच्या प्रवाहात उडी घेऊन रेहान व आसिफ शेख यांना वाचविण्यात यश मिळवले. दोघांनाही वाळपईच्या सरकारी सामाजिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रेहानची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला गोमेकॉत हलविण्यात आले तर आसिफ शेख याची प्रकृती प्राथमिक उपचारानंतर सुधारल्याने त्याला घरी पाठविण्यात आले.
अग्निशामकच्या जवानांनी इर्फानला काढले बाहेर
दरम्यान, इर्फान शेख हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर दूरवर वाहून गेल्याने वाळपई अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी इर्फानला बाहेर काढले. त्याला वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱयांनी त्याचे निधन झाल्याचे घोषित केले.
वाळपई पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मयत इर्फानचा मृतदेह गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
साहील व सागर यांच्या धाडसाचे कौतुक
दरम्यान, जीवाची पर्वा न करता तिन्ही भावडांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेणाऱया साहिल लाड व त्याचे काका सागर यांचे परिसरामध्ये कौतुक करण्यात येत आहे. पाण्याचा प्रवाह मोठा असतानासुद्धा पाण्यामध्ये उडी टाकून त्यांनी धाडसी पाऊल टाकल्याबद्दल या परिसरामध्ये त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
आंघोळ करण्यासाठी सदर जागा धोक्याची : लाड
दरम्यान, साहिल लाड यांनी सांगितले की, आम्ही दोघांना वाचविण्यात यश मिळविले मात्र इर्फानला वाचवू शकलो नाही याचे दुःख आहे. सध्या नदीतील पाण्याच्या प्रवाहाला खूप गती आहे. यामुळे नदीत आंघोळ करणे धोक्मयाचे आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी सदर तीन भावंडे आंघोळ करण्यासाठी गेली होती सदर जागा धोकादायक आहे. यामुळे त्या ठिकाणी आंघोळीसाठी कोणीही जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केलेले आहे.