या निवडणुकीत भाजप दुर्लक्षिता येण्यासारखा नाही
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे सहा टप्पे पूर्ण झाले असून 223 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता 26 आणि 29 एप्रिलचे दोन टप्पे उरले आहेत. तथापि, आतापासूनच परिणामांची उत्सुकता जाणवू लागली आहे. ही निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातच होणार असून डावे आणि काँग्रेसची आघाडी स्पर्धेत मागे पडली आहे, असे जवळजवळ सर्व तज्ञांचे मत आहे. त्यामुळे या दोन पक्षांमधील स्पर्धेत कोण बाजी मारणार? याबद्दल जमिनीवर प्रत्यक्ष काम करणाऱयांमध्ये दुमत आहे.
तृणमूल काँग्रेससमोर दोन महत्त्वाची आव्हाने आहेत. त्यापैकी पहिले दहा वर्षांची प्रस्थापित विरोधी भावना आणि सरकारच्या कामाबद्दल नाराजी तर दुसरे कारण हिंदू आणि मुस्लीम असे धार्मिक ध्रुवीकरण हे आहे. सर्वसामान्य मतदाराचे मत ममता बॅनर्जी यांच्याबद्दल चांगले असले तरी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कनि÷ पातळीवर केलेला भ्रष्टाचार, सरकारी योजनांच्या लाभार्थींकडून ‘कटमनी’ मागणे, ‘अम्फान’ या चक्रीवादळात केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक मदतीचा गैरव्यवहार, तृणमूलच्या जमिनीवरील कार्यकर्त्यांची दादागिरी, गुंडगिरी आणि काही प्रमाणात गुन्हेगारी यामुळे राज्य सरकारबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे, असे अनेक वृत्तसंस्थांच्या पत्रकारांनी स्पष्टपणे नोंद केले आहे.
बॅनर्जी स्वतः जबाबदार
हिंदू आणि मुस्लीम अशा धार्मिक धुवीकरणासाठी ममता बॅनर्जी स्वतःच जबाबदार आहेत, असे मत केवळ अनेक पत्रकारांचेच आहे, असे नाही. तर डाव्या पक्षाचे अनेक कार्यकर्ते व नेत्यांचेही हेच मत आहे. मुस्लीम मते डाव्या पक्षांकडे जाऊ नयेत यासाठी ममता बॅनर्जींनी मुस्लीम तुष्टीकरणाचा मार्ग स्वीकारला. यामुळे डाव्यांची शक्ती कमी करण्यात त्या यशस्वी ठरल्या असल्या तरी भाजपसाठी त्यांनी पश्चिम बंगालचा दरवाजा मोकळा करून दिला, असा उघड आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अनेक उमेदवार करताना दिसतात. परिणामी या निवडणुकीने राज्यात कधी नव्हता असा हिंदू-मुस्लीम रंग घेतला आहे, असे मत अनेक अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. याचा परिणाम नेमका काय आणि कसा होतो? हे 2 मे या दिवशीच दुपारी दोन वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.
दोन्ही पक्षांची शक्तीस्थाने
राज्यात दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांची शक्तीस्थाने ही परस्पर विरोधी आहेत. धार्मिक धुवीकरणामुळे बव्हंशी मुस्लीम मतांचा ओढा बॅनर्जी यांच्याकडे असल्याचे दिसते. तथापि, त्याची प्रतिक्रिया म्हणून अनेक ठिकाणी हिंदूंचेही प्रतिधुवीकरण होताना पहावयास मिळते. धुवीकरणाची ही प्रक्रिया सर्वसाधारणतः शहरी भागात असते, असे मानले जात होते. तथापि, यावेळी पश्चिम बंगालमध्ये ती ग्रामीण भागातही मूळ धरताना दिसू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नेमका परिणाम काय होणार?
राज्य सरकार विरोधातील नाराजी आणि हिंदू-मुस्लीम धुवीकरण यांचा परिणाम म्हणून ममता बॅनर्जी निश्चितपणे पराभूत होतील, असे मात्र आताच सांगता येत नाही, असेही तज्ञांनी म्हटले आहे. याची कारणे दोन आहेत. 2016 मध्ये भाजपला अवघी 10 टक्के मते आणि 3 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतरच्या पाच वर्षांत भाजप किती मजल मारू शकेल, याबद्दल दुमत आहे. भाजपला बहुमत मिळवायचे असेल तर आणखी किमान 145 जागा आणि आणखी किमान 35 टक्के मते मिळवावयास हवीत. हे आव्हान केवळ पाच वर्षांच्या अंतरात पार करणे भाजपच नव्हे तर कोणत्याही पक्षासाठी कठीण असेच आहे. हा ममता बॅनर्जींचा प्लस पॉईंट असल्याचे मानले जाते. तथापि, 2016 च्या विधानसभा निवडणुकीनंतर तीनच वर्षांत झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली होती. तीन वर्षांच्या काळात एवढा बदल होऊ शकतो तर विधानसभा निवडणुकीपर्यंत तो आणखी वाढूही शकतो, असेही एक मत आहे. त्यामुळे नाराजी आणि धार्मिक धुवीकरण यांचा परिणाम नेमका कसा होणार? याबद्दल तज्ञांमध्ये दुमत असून ते अधिक औत्सुक्मयाचे कारण ठरले आहे.