सकाळपासूनच कार्यालय आवारात नागरिकांच्या लागल्या रांगा
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने परप्रांतीयांना घरी जाण्याची ओढ लागली आहे. परवाना मिळविण्याकरिता महापालिकेत धाव घेतली असून सोमवारी सकाळपासूनच कार्यालय आवारात परप्रांतीय नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र सामाजिक अंतर राखण्याच्या नियमावलीला हरताळ फासल्याचे यावेळी दिसून आले.
बेळगाव जिल्हय़ाची ऑरेंज झोनमध्ये नोंद करण्यात आली असून औद्योगिक वसाहतींसह विविध व्यवसाय सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच परप्रांतीयांना घरी जाण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परराज्यात जाणाऱया नागरिकांसाठी सिंधू सेवा संकेतस्थळावर अर्ज करण्याची सूचना करण्यात आली आहे. पण बहुतांश नागरिकांना ऑनलाईन नोंद करताना अडचणी येत आहेत.
शहरात विविध कामानिमित्त परप्रांतीय कामगार आले होते. त्यांना ऑनलाईन नोंद करण्याची माहिती नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेऊन चौकशी करीत आहेत. त्यामुळे महापालिकेच्यावतीने कार्यालय आवारात चार संगणकांची सोय करून परप्रांतीयांच्या अर्जाची नोंद करून घेण्यात येत आहे. बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान अशा विविध राज्यांतील कामगार आपल्या घरी जाण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून प्रयत्न करीत आहेत. मात्र बस, रेल्वे अशी कोणतीही दळणवळणाची सुविधा उपलब्ध नसल्याने अडकून पडले आहेत. अशा शेकडो कामगारांना घरी जाण्याचे वेध लागले आहेत.
परवानगी देण्यात येत असल्याचे समजताच सोमवारी सकाळी कामगारांनी व नागरिकांनी महापालिकेकडे धाव घेतली. यावेळी विविध कागदपत्रांसह महापालिका कार्यालयासमोर रांग लावली. नागरिकांची गर्दी वाढत असल्याने संगणकांची संख्या वाढविण्यात आली. पण यावेळी सामाजिक अंतर ठेवण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले.
प्रवेशद्वारापर्यंत लागली रांग
कार्यालयात दाखल झालेल्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी कामगारांना सामाजिक अंतर राखण्याची सूचना करून दोन रांगेत उभे केले. ऑनलाईन अर्ज करण्याकरिता वेळ लागत असल्याने काही कामगारांना बसण्याची सूचना केली. त्यामुळे रांग प्रवेशद्वारापर्यंत लागली होती.
आवश्यक सुविधा नसल्याने नाराजी
महापालिकेने कामगारांची अडचण पाहून चार संगणकांची सोय करून अर्ज भरण्यास उपलब्ध करून दिले. पण कामगारांना पिण्याच्या पाण्याची सुविधा किंवा अन्य आवश्यक सूचना करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे पाणी मिळेल का? अशी विचारणा कामगार करीत होते. याठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीमधील पाणी घेऊन कामगारांना प्यावे लागले. आवश्यक सुविधा नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.