पुणे/प्रतिनिधी
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन आज नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी गडकरींनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. प्रशासनाकडून मोठमोठी कामं वेगाने कशी करून घ्यायची, याविषयी गडकरींनी यावेळी बोलताना टिप्पणी केली.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या वेगवान कामासाठी आणि वेगवेगळ्या कल्पनांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. तसेच प्रशासनाकडून काम करून घेण्यामध्ये नितीन गडकरींचा हातखंडा आहे. पण गडकरी ही कामं प्रशासनाकडून कशी करून घेतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचंच उत्तर गडकरींनी पुण्यात उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना दिलं आहे.
गडकरींनी पुण्यातील नदी विकास प्रकल्पाच्या कामाबद्दल एक आठवण यावेळीसांगितली. “पुण्यातील नदी विकास प्रकल्प जवळपास १४०० कोटींचा आहे. त्या प्रकल्पावर दिल्लीत चर्चा झाली. पण तो अडकून पडला होता. तेव्हा शेतकरी जसा बैलांच्या मागे तुतारी घेऊन लागतात, तसं सरकारमध्ये प्रशासनाच्या मागे तुतारी घेऊन राहिलं, तर त्याचंच काम होतं, बाकीच्यांचं होत नाही. त्या वेळी मी सचिवांना या कामाची तातडीनं कंत्राटं काढण्याचे निर्देश दिले. आता जायकाचे १४०० कोटींचे टेंडर निघाले आहेत आणि काम देखील सुरू झालं आहे”, असं गडकरी यावेळी म्हणाले.