नगराध्यक्षपदीजयवंतभाटलेतरउपनगराध्यक्षपदीनीताबागडेयांचीनिवड
प्रतिनिधी/ निपाणी
संपूर्ण जिल्हय़ाचे लक्ष लागून राहिलेल्या निपाणी पालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपने बाजी मारली. नगराध्यक्षपदी भाजपचे जयवंत भाटले तर उपनगराध्यक्षपदी भाजपच्याच नीता बागडे यांची निवड करण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी 16 मतांची गरज असताना जयवंत भाटले यांना 19 तर काँग्रेस पुरस्कृत शहर विकास आघाडीच्या उमेदवार अनिता पठाडे यांना 13 मते मिळाली. उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने नीता बागडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून निपाणी शहरवासीयांना नगराध्यक्ष कोण होणार?, याची उत्सुकता लागली होती. यातच प्रत्यक्ष निवडणुकीच्या तीन दिवसापूर्वी भाजपचे नगरसेवक सहलीवर गेल्यानंतर अंतर्गत खलबते जोरात सुरू झाली होती. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीवेळी काय होणार?, याची उत्कंठा वाढली होती. शनिवारी सकाळी निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी युकेशकुमार एस. यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक कार्यक्रम सुरू झाला. 10 ते 12 यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती.
त्यानुसार भाजपतर्फे सकाळी 11.30 वाजता नगरसेवक जयवंत भाटले यांनी अर्ज दाखल केला. त्याला सूचक म्हणून नगरसेवक राजू गुंदेशा व सद्दाम नगारजी यांनी अनुमोदन दिले. तर शहर विकास आघाडीतर्फे 11.50 वाजता नगरसेविका अनिता पठाडे यांनी अर्ज दाखल केला. त्याला नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार यांनी अनुमोदन दिले. उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेविका नीता बागडे यांनी सकाळी 11.37 वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याला नगरसेविका प्रभावती सूर्यवंशी व कावेरी मिरजे यांनी सूचक म्हणून अनुमोदन दिले.
दुपारी 2 ते 2.15 यावेळेत उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी 5 मिनिटांची मुदत देण्यात आली. यावेळी कोणीही अर्ज मागे न घेतल्याने दुपारी 2.20 वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. यावेळी जयवंत भाटले यांच्या बाजूने मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले, बंडखोर नगरसेवक संतोष माने यांच्यासह एकूण 19 जणांनी हात उंचावून पाठिंबा दिला. तर विरोधी उमेदवार अनिता पठाडे यांच्या बाजूने 13 नगरसेवकांनी हात उंचावून पाठिंबा दिला. त्यामुळे जयवंत भाटले यांना नगराध्यक्ष म्हणून विजयी घोषित करण्यात आले. तर उपनगराध्यक्षपदी नीता बागडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा प्रशासनाबरोबरच मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजी
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीबरोबरच निपाणी नगरपालिकेत भाजपची सत्ता स्थापन झाल्याचे समजताच नगरपालिकेबाहेर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीसह विजयाच्या घोषणा दिल्या. यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून विजयी मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डीवायएसपी मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय संतोष सत्यनायक, शहर पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, ग्रामीणचे उपनिरीक्षक बसवराज तळवार यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
प्रवेशावरुन शाब्दीक बाचाबाची
दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करताना केवळ उमेदवार व नगरसेवकांनाच पालिकेत प्रवेश देण्यात आला होता. यावेळी नेत्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच यावेळी शाब्दीक बाचाबाची झाल्याचे दिसून आले. मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली.
आशीर्वादाचे विकासात रुपांतर करु
दरम्यान पालिकेत भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, निपाणी शहरवासीयांनी भाजप नगरसेवकांना बहुसंख्येने निवडत आशीर्वाद दिला होता. आता सत्ता स्थापनेनंतर त्या आशीर्वादाचे विकासामध्ये रुपांतर करून सर्वच प्रभागात विकासकामे राबवण्यात येतील. निपाणीच्या विकासासाठी नगरसेवकांनी एकजुटीने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक, नगरसेविका, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शहर विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न
यावेळी बोलताना नूतन नगराध्यक्ष जयवंत भाटले म्हणाले, मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवकांनी जी खंबीर साथ दिली. त्याबद्दल कृतज्ञ आहोत. सबका साथ, सबका विकास या उद्देशानुसार काम करणार आहोत. सर्वांना बरोबर घेऊन शहरात विकासकामे राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत, असे सांगितले.
आमचा नैतिक विजय
यावेळी विरोधी नगरसेवक विलास गाडीवड्डर म्हणाले, निपाणी पालिकेच्या इतिहासात प्रथमच मंत्री व खासदारांना एकाचवेळी येऊन नगराध्यक्ष निवडीसाठी मतदान करावे लागले. यातच आमचा नैतिक विजय आहे. यापुढे विकासाच्या कामांना नेहमी सहकार्य करू. मात्र चुकीचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न झाल्यास तेव्हा सक्षम विरोधकाची भूमिका बजावू, असे सांगितले.
अन् बंद घडय़ाळाकडे सर्वांचे लक्ष
दरम्यान दुपारी 2.15 ते 2.20 अशी 5 मिनिटे वेळ उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दिली होती. त्यावेळी सर्वांचेच लक्ष सभागृहातील घडय़ाळाकडे होते. 5 मिनिटे वेळ संपून गेली तरीही घडय़ाळात 2.15 वाजले होते. त्यावेळी नीट पाहिले असता घडय़ाळच बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे एकच फजिती उडाली. यानंतर दुसऱया घडय़ाळाद्वारे उर्वरित वेळ पाळत निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.