ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कृषी विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या आठ खासदारांनी सोमवारी दुपारपासून संसद आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. आज सकाळी उपसभापती हरिवंश सिंह त्यांच्या भेटीला चहा घेऊन पोहचले. मात्र, आंदोलनकर्त्या खासदारांनी चहाला नकार दिला. तसेच भाष्य करणे टाळले. त्यामुळे दुखावलेल्या उपसभापतींनी एक दिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला.
उपसभापती हरिवंश सिंह यांनी पत्र लिहून राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून याबद्दल माहिती दिली आहे. हरिवंश सिंह यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्यसभेत रविवारी (दि.20) जो गदारोळ झाला, लोकशाहीच्या नावाखाली सदस्यांकडून जो हिंसक प्रयत्न झाला तसेच उच्च सभागृहाची मर्यादा आणि व्यवस्थेचे उल्लंघन करण्यात आले, त्यामुळे मी दुखावलो आहे. आज सकाळी मी आंदोलनकर्त्या नाराज खासदारांना चहा देण्यासाठी गेलो. त्यांनी चहाला नकार दिला. तसेच त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्नही त्यामुळे फोल ठरला. अखेर मीच एक दिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला.
कृषी विधेयकांवरून रविवारी राज्यसभेत झालेल्या गदारोळप्रकरणी टीमएमसीचे डेरेक ओब्रियन, डोला सेन, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, काँग्रेसचे राजीव सातव, रिपून बोरा आणि सय्यद नासिर हुससैन, सीपीआय (एम)चे के के रागेश आणि एल्मलारन करीम या आठ खासदारांना एक आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.