बिहारचे दौरे करण्यापेक्षा राज्यात लक्ष द्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला
केंद्र सरकार परदेशातील नाही, आपलेच आहे
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
केंद्र सरकार हे आपलेच असून, नैसर्गिक आपत्तीच्या काळात राज्यांना मदत करण्याचे काम आजवर झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्यासाठी मदत मागण्यात गैर काय ? केंद्र सरकार परदेशातील नसून, आपलेच आहे. राजकारणात चिखलफेक करून एकमेकांवर उडवू नये. जनतेला दिलासा देणे महत्त्वाचे आहे. तुम्ही बिहारचे दौरे करण्यापेक्षा आपल्या राज्याकडे लक्ष द्या, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांना लगावत सर्वांनी मिळून केंद्राकडून राज्याला मदत घ्यावी, अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोमवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. अक्कलकोट येथील काही गावांना भेटी देत प्रत्यक्ष बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांची नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर शहरातील जिल्हा नियोजन भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, अतिवृष्टीत नुकसान झालेल्याची मदत केंद्र सरकारही करणार आहे. यासाठी मला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून म्हणाले होते की, तुम्ही काळजी करू नका, केंद्र सरकार तुमच्या पाठीशी आहे, पूर्ण मदत करू, असे आश्वासनही मोदी यांनी दिले आहे. विरोधकांनी कोणतेही राजकारण आणू नये. सोलापूर जिह्यासह राज्यातील कित्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. काळजी करू नका. जे जे शक्मय होईल, ते सगळं केल्याशिवाय राहणार नाही.
अजून काय म्हणाले मुख्यमंत्री
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही
आताच घोषणा करत नाही. पंचनामे, आढावा घेऊन घोषणा करू
शेतकरी, नागरिकांच्या पाठीशी सरकार
शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, त्यांचे दु:ख ओळखून योग्य ती मदत करू