दुरुस्तीला हरकत नाही: विजय चव्हाण
प्रतिनिधी/कोल्हापूर
पंचगंगा घाटाच्या दुरुस्तीला पुरातत्त्व खात्याची कोणतीही हरकत नाही. पण तेथे नवीन बांधकाम होत असल्याचे लक्षात आल्यावरच त्याला हरकत घेण्यात आली असल्याचे पुरातत्त्व खात्याचे सहाय्यक अभिरक्षक विजय चव्हाण यांनी `तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
विजय चव्हाण म्हणाले, पुरातत्त्व खात्याने घाटाचे संवर्धन नको असे म्हटलेले नाही. खुदाई करून नवीन बांधकाम करू नये ही अपेक्षा आहे. व ती पुरातत्त्व वास्तूंच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. पुरातत्वच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी घाटाची त्यासाठी पाहणीही केली आहे. ते म्हणाले, पुरातत्त्व ठिकाणाच्या म्हणजे ब्रह्मपुरी पासून शंभर मीटर अंतरावर नवीन बांधकामास परवानगी नाही. पंचगंगेचा घाट त्या क्षेत्रात येतो. घाटाचे संवर्धन करण्यास कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. पण घाटावर किंवा त्याच्या परिसरात आत्ता जे नाही ते कन्स्ट्रक्शन तेथे होणार असेल तर त्याला हरकत घेतली गेली. आहे तेथे खड्डे काढत असल्याचे कळाल्यावर हरकत घेण्यात आली. पुरातत्त्व कोणत्याही विकासकामात अडथळा आणत नाही.
योग्य तो मार्ग काढू
दरम्यान घाटाचे संवर्धन होईल व पुरातत्व या अटीचा भंग होणार नाही अशा दृष्टीने आपण यातून नक्कीच मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील राहू. पंचगंगेवरील नवीन पुलाच्या उर्वरीत बांधकामासाठी असेच प्रयत्न उपयोगी पडले – खासदार संभाजीराजे छत्रपती.
नवे बांधकाम नको
पंचगंगा घाटाची दुरुस्ती आवश्यक आहे. पण तेथे नवीन बांधकाम होणे योग्य नाही. कारण पंचगंगेच्या घाटाला वेगळा इतिहास आहे. घाट भक्कम झाला पाहिजे. पण तेथे नवे बांधकाम नको. हे योग्य ठरणार नाही. नव्या बांधकामामुळे घाट समूह नष्ट होईल. – इंद्रजित सावंत. इतिहास संशोधक.