अमित शाह यांची प्रचारसभा : कॅप्टन यांच्याकडून जय श्रीरामचा नारा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पंजाबमध्ये भाजप तसेच घटक पक्षांसाठी प्रचारसभा घेतली ओह. पंजाबला 70 च्या दशकाप्रमाणे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य करायचे असल्यास नरेंद्र मोदींचे हात बळकट करावे लागतील असे शाह यांनी म्हटले आहे. शाह यांनी व्यासपीठावरून जय श्रीराम असा नारा देताच कॅप्टन अमरिंदर सिंह देखील जय श्रीराम म्हणताना दिसून आले आहेत.
पंजाबला नशामुक्त करणार
5 वर्षांमध्ये पंजाबला नशामुक्त करणार असे आश्वासन देत आहे. अमली पदार्थांपासून अकाली दल तसेच काँग्रेस मुक्ती मिळवून देऊ शकत नाही. केजरीवला दिल्लीच्या तरुणाईला मद्याच्या नशेत लोटून पंजाबला नशामुक्त करणार असल्याचे म्हणत आहेत. 2020-21 मध्ये देशात अमली पदार्थ पकडण्याचे काम मोदी सरकारने केल्याचे शाह म्हणाले.
लुधियाना, अमृतसर, पतियाळासमवेत चार ठिकाणी नार्कोटिक्स ब्युरोची केंद्रे स्थापन केली जातील. अमली पदार्थांचे सेवन तरुणाईला उद्ध्वस्त करते. अमली पदार्थांपासून पंजाबच्या भूमीला मुक्ती मिळवून देण्याची वेळ आली आहे. हे काम केवळ भाजपच करू शकते. राज्यात रालोआ आणि देशात रालोआ सत्तेवर असेल तरच हे घडणार असल्याचे शाह म्हणाले.
शेतकऱयांचे उत्पन्न वाढवू
सर्व लोक पंजाबच्या शेतकऱयांसाठी अनेक गोष्टी बोलत आहेत. पंजाबमध्ये आता शेतीच्या पद्धती बदलण्याची वेळ आली आहे. शेतकऱयांचे उत्पन्न कमी न करता शेतीच्या पद्धतींमध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे. 70 च्या दशकात पंजाबचे नाव प्रत्येक क्षेत्रात पहिल्या स्थानावर होते. परंतु आता ही स्थिती राहिली नसल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
काँग्रेसकडून कॅप्टन यांचा अपमान
कॅप्टन अमरिंदर सिंह हे अत्यंत वरिष्ठ नेते आहेत. काँगेसने कॅप्टन यांना दिलेली वागणूक पाहता पतियाळातील 9 पैकी एकाही ठिकाणी काँग्रेसचा विजय होऊ देऊ नये असे जनतेला आवाहन करतो. चरणजीत चन्नी यांच्याकडे पाहिल्यास अनेकदा एखादा चित्रपट पाहत असल्याचे वाटते. हे करू, ते करू असे चन्नी म्हणतात, परंतु त्यांच्याकडे कुठलाच रोडमॅप नाही. सर्व ऊर्जाप्रकल्प संकटात आहेत. 3 औष्णिक ऊर्जा प्रकल्प बंद झाले असून दोन प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत असे शाह यांनी सांगितले आहे.
मोदींकडून शिखांसाठी कार्य
कॅप्टन अमरिंदर मुख्यमंत्री असताना कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करण्याची मागणी समोर आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्वरित तो खुला करण्याचे काम केले. दरबार साहिबसाठी एफसीआरएची अनुमतीही मोदींनीच मिळवून दिली. लंगरला जीएसटीपासून मुक्ती मिळवून देण्यात आली. अमृतसरला ऐतिहासिक आणि स्मार्ट सिटीचा दर्जा भाजपने दिला. पंजाबला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करायचे असल्यास भाजपला विजयी करण्याची गरज असल्याचे उद्गार शाह यांनी काढले आहेत.