पंजाबमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. राज्यात आतापर्यंत 130 रुग्ण सापडले आहेत. तर 10 जणांचा बळी गेला आहे. परंतु मोहाली जिल्हय़ातील एका गावात 34 रुग सापडल्याने खळबळ उडाली आहे. जवाहरपूर गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मोहालीचे (साहिबजादा अजित सिंग नगर) उपायुक्त गिरिश दयालाल यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. मोहालीत आतापर्यंत कोरोनाचे 50 रुग्ण सापडले आहेत. यात सर्वाधिक 34 रुग्ण जवाहरपूर गावातच आढळले आहेत. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जणांना संसर्गापासून मुक्तता मिळाल्याचे ते म्हणाले.
कोरोना संकटामुळे पंजाब सरकारने 1 मेपर्यंत टाळेबंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर राज्यात मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी याची माहिती दिली आहे. पंजाबमध्ये आपत्कालीन स्थिती किंवा आवश्यक सामग्रीसाठी घरातून बाहेर पडल्यास मास्क अवश्य परिधान करा असे सिंग यांनी म्हटले आहे.
टाळेबंदी आवश्यक
पंजाबच्या 17 जिल्हय़ांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने मुख्यमंत्री अमरिंदर यांनी केंद्रसरकारकडून घोषित 21 दिवसांची टाळेबंदी 1 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. विषाणूचा समूह संसर्ग रोखण्याचा हाच प्रभावी मार्ग असल्याचे सरकारचे मानणे आहे. 1 मेपर्यंत चालणाऱया टाळेबंदीदरम्यान सरकार आवश्यक सामग्रीचा पुरवठा ऑनलाईन डिलिव्हरीच्या माध्यमातून केला जाणार आहे.
पिकखरेदीसाठी नवी बाजारपेठ
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाने जिल्हय़ांच्या उपायुक्तांना नवी बाजारपेठ निश्चित करण्याचा निर्देश दिला आहे. पिक खरेदीदरम्यान सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही व्यवस्था 3800 बाजारपेठांच्या व्यतिरिक्त असणार आहे.