प्रतिनिधी पंढरपूर
आसाम राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि पंढरपूरचे सुपुत्र नितीन खाडे (आयएएस) यांनी आसाम राज्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल भारत निवडणूक आयोगाने घेतली आहे. खाडे यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यांना दिल्ली येथे खास कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे.
आसाममध्ये अतिरेकी, जातीय आणि वांशिक हिंसाचाराचा मोठा इतिहास आहे. निवडणूकीच्या काळात अतिरेकी हिंसाचाराच्या घटना पूर्वी अनेक वेळा घडल्या आहेत. त्यामुळे निवडणूक काळात मतदारांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे मोठे आव्हान होते. या आव्हानांचा गांभीर्याने विचार करून श्री. खाडे यांनी यंत्रणा राबवली.
अनेक प्रकरणांमध्ये कायद्याचे उल्लंघन करताना दिसणार्यांच्या विरुध्द एफआयआर दाखल करण्यासाठी त्वरीत आणि प्रभावी कारवाई करण्यात आली. सोशल मिडियावरुन आणि प्रत्यक्ष शांतता आणि सौदार्ह बिघडवणार्या अनेक घटनांना वेळीच आणि कठोर उपाय करुन आळा घालण्यात आला. पोलिस आणि प्रत्यक्ष निवडणूक यंत्रणेत समन्वय राखण्यात आला.
सहायक मतदान केंद्रांच्या निर्मितीमुळे मतदान केंद्रांची संख्या पाच हजाराने वाढल्याने मनुष्यबळाची व्यवस्था आणि त्यांचे प्रशिक्षण हे मोठे आव्हान होते. या सर्व आव्हानांचा विचार करून श्री.खाडे यांनी नियोजन बद्ध काम केले. कोविडसह अनेक आव्हाने समोर असताना देखील श्री.खाडे यांनी अत्यंत नियोजनपूर्वक आणि काटेकोरपणे यंत्रणा राबवली.
भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करत असताना निवडणूक निष्पक्ष रितीने पार पडावी, जास्तीत जास्त मतदारांनी कोविडच्या अनुषंगाने नियमांचे पालन करत मतदानाचा हक्क बजावावा यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांच्या कामाची दखल भारत निवडणूक आयोगाने घेतली असून त्यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथे एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये नितीन खाडे यांना गौरविण्यात येणार आहे.
निवडणूक निष्पक्ष आणि सुरक्षित पार पडली.
14 फेब्रुवारी ते 6 एप्रिल 2021 या कालावधीत कोविड 19 महामारीच्या काळातहि एकूण 9 लाख 15 हजार 993 नवीन मतदार मतदार यादीत जोडले गेले.कोविडचा प्रादुर्भाव असूनहि 2019 च्या लोकसभा विधानसभा निवडणूकीसाठी मतदान 0.5 टकके ने वाढले. मतदानावेळी कोविडच्या अनुषंगाने सर्वती काळजी घेण्यात आली. मतदान कर्मचार्याचा कोविड संबंधित मृत्यू झाला नाहि आणि हिंसाचारात देखील कोणाचाहि मृत्यू झाला नाहि. निवडणूक निष्पक्ष आणि सुरक्षित पार पाडली गेली.