दिवे पेटवून दाखविले कोरोनाविरुद्ध एकीचे बळ
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाविरोधी लढय़ात एकीचे बळ दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री दिवे लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला बेळगावकरांनी मोठा प्रतिसाद दिला. रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी घरांमधील लाईट बंद करून दारात, बाल्कनीत, गच्चीवर दिवा, मेणबत्ती, मोबाईलचा फ्लॅशलाईट, टॉर्च लावून आवाहनाला प्रतिसाद देण्यात आला. यामुळे रविवारी रात्री शहरात सर्वत्र दिव्यांचा झगमगाट दिसत होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनमुळे घरांमध्ये असणाऱया नागरिकांना कोरोनाविरुद्ध एकतेची भावना निर्माण व्हावी याकरिता हा अभिनव उपक्रम सांगितला होता. यापूर्वी जनता कर्फ्यूदिवशीही नागरिकांनी अत्यावश्यक सेवा देणाऱया योद्धय़ांच्या कृतज्ञतेबद्दल टाळय़ा वाजविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यालाही बेळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. यावेळीही नागरिकांनी घरोघरी दिवे लावून कोरोनाविरुद्धच्या लढय़ामध्ये आम्ही सर्व एक आहोत, हे दाखवून दिले आहे.
रविवारी सायंकाळपासूनच नागरिकांनी यासाठीची तयारी सुरू केली होती. दिवे, मेणबत्त्या घेऊन नागरिक घरांच्या छतावर, बाल्कनीत उभे होते. रात्री 9 वाजता दिवे लावण्यास सुरुवात करण्यात आली. यामुळे संपूर्ण दिव्यांच्या प्रकाशाने लखलखत होते. शहराचे एक वेगळेच चित्र यामुळे पाहायला मिळाले. दिवाळीप्रमाणे हे दृश्य दिसत होते.
सोशल मीडियावरून मागील दोन दिवसांपासून यासंबंधीचे आवाहन करण्यात येत होते. काही जणांनी आपला डीपीही अशाच पद्धतीचा ठेवला होता. दिवे लावतेवेळी काही जणांनी दिव्यांवर आधारित गीते लावली होती. दिव्यांच्या प्रकाशाने कोरोनाचे संकट दूर होऊ दे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दिवे लावल्यानंतर काढलेले फोटो अपलोड करण्यासाठी प्रत्येकाची गडबड सुरू होती. एक दिवा देशासाठी असाही काहींनी टेंड सुरू केला होता.
…आणि अफवांचे पीक
देशातील प्रत्येकाला कोरोनाबाबतचे गांभिर्य समजावे व कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी हा उपक्रम केला होता. परंतु त्यालाही विविध संदर्भ देऊन अफवा पसरविण्यात येत होत्या. एकाच वेळी दिवे लावल्यास उष्णता निर्माण झाल्यास कोरोना दूर जाईल, 5 एप्रिल हा दिवस कालगणनेत महत्त्वाचा असल्याने त्याची निवड करण्यात आल्याच्या अफवा सोशल मीडियामधून पसरविण्यात येत होत्या.
हेस्कॉमची तारेवरची कसरत
रात्री 7 नंतर शहराच्या कोणत्याही भागामध्ये वीजपुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी हेस्कॉमकडून घेण्यात आली होती. विजेची मागणी एकाच वेळी कमी व जास्त झाल्याने कुठेही धोका पोहचणार नाही यासाठी हेस्कॉमला तारेवरची कसरत करावी लागली. हेस्कॉमच्या अधिकाऱयांनी रविवारी सकाळपासूनच या संदर्भात खबरदारी घेण्यास सुरुवात केली होती.