नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाबमध्ये 5 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीनंतर एका महिन्यानंतर प्रथमच, चौकशी समितीने तपासात सुरुवात केली आहे. तपास अहवाल तयार करण्याच्या उद्देशाने रविवारी पाच सदस्यीय समिती रविवारी फिरोजपूर येथे घटनास्थळी पोहोचली. फिरोजपूर येथे जाहीर सभेला जाताना पंतप्रधान सदर उड्डाणपुलावर सुमारे 15 ते 20 मिनिटे अडकले होते. उड्डाणपुलावरील पाहणीनंतर ज्याठिकाणी पंतप्रधानांची संभाव्य रॅली होणार होती त्याठिकाणीही समितीचे सदस्य पोहोचले. न्यायमूर्ती मल्होत्रा यांच्यासोबत चंदीगडचे डीजीपी, राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) आयजी, पंजाबचे एडीजीपी सुरक्षा आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल होते.
सर्वोच्च न्यायालयाने 12 जानेवारी रोजी सुरक्षेतील त्रुटींच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. पंतप्रधानांच्या दौऱयाशी संबंधित संपूर्ण रेकॉर्ड आधीच समितीकडे पोहोचवण्यात आले असून समितीने त्याचा आढावाही घेतला आहे. आता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तपास करण्यात आला.